आम्ही तीन पिढ्या वीज बिल भरलेले नाही; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी जाहीरपणे सांगितले
बुलडाणा : शेतकऱ्यांना वीज बिले माफ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने जुलै महिन्यात घेतला होता. या निवर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. मात्र, यावरून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथे प्रतापराव जाधव आणि रक्षा खडसे या केंद्रीय मंत्र्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री प्रतापराव जाधव यांनी हे वक्तव्य केले आहे.
तीन पिढ्या आम्ही वीज बिल भरले नाही. मी शेतकरी आहे. आजोबांनी भरले नाही, वडिलांनी भरले नाही. मीही भरत नाही. डीपी जळाला की हजार-दोन हजार रुपये इंजिनिअरला देतो आणि डीपी आणून बसवतो, असे प्रतापराव जाधव म्हणाले. लाखो रुपयांचे वीज बिल आपल्या सरकारने माफ करण्याची हिंमत केली. नाहीतर लोडशेडिंगमुळे रात्री शेतात जावे लागायचे. आता दिवसाही वीज मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सध्या सुमारे ४६ लाखांहून अधिक कृषिपंप असून सरकार ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीज पुरवणार आहे. या निर्णयाचा लाभ ४४ लाख सहा हजार शेतकऱ्यांना होईल, असे अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा करताना सांगितले होते. सध्या कृषी ग्राहकांना प्रतियुनिट सुमारे दीड रुपयाप्रमाणे बिल पाठवले जाते. वार्षिक सुमारे सहा हजार कोटी रुपयांची बिले पाठवली जातात. त्यापैकी केवळ पाच टक्के म्हणजे २८०-३०० कोटी रुपयांपर्यंतच बिल वसुली होते. काही काळापूर्वी हे प्रमाण
आठ-दहा टक्क्यांवर गेले होते, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे सध्या एकप्रकारे ९५ टक्के कृषिपंपांच्या बिलांची वसुली होत नाही व मोफतच वीज पुरवली जात आहे.
दोन समविचारी बैल...
जसे दोन समविचारी बैल शेतीत जुंपले की शेती चांगली होते, तसेच सरकारचे आहे. केंद्र आणि राज्य सरकार समविचारी असले की विकास होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक खासदारावर, प्रत्येक खात्यावर बारीक लक्ष असते. मात्र, मंत्री झाल्यावर आमचा सामान्य माणसाशी संपर्क कमी होतो आहे, असेही प्रतापराव जाधव म्हणाले.