टॅंकर माफिया जिंवत अन् आमच्या नळाला पाणी नाही, सुप्रिया सुळेंचा महापालिकेला घेराव घालण्याचा इशारा
पुण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. एकेकाळी टॅंकर माफिया जिंवत राहिल अन् आमच्या नळाला पाणी येणार नाही, अशी परिस्थिती ओढवली जाऊ शकते. टॅक्स भरूनही आम्हाला पाणी मिळत नाही. त्यामुळे, पुढच्या ७ ते ८ दिवसात पाणी आणि हवा प्रदुषणावर तोडगा काढावा. अन्यथा १ डिसेंबरला महापालिकेला घेराव घालून एकाही अधिकाऱ्याला बाहेर पडू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (दि. २४) महापालिकेत आढावा बैठक घेतली. त्यामध्ये कचरा, पाणी, स्वच्छता, रस्ते, वारजे रुग्णालय यासह अन्य विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “शहरातील कचरा, पाणी, स्वच्छता या समस्या गंभीर होत आहेत. आहे त्या स्थितीमध्ये सर्वांना पाणी देणे अवघड आहे असे प्रशासनच मान्य करत आहे. असे असताना शहरात नव्याने बांधकाम परवानग्या दिल्या जात असून, यासाठीच्या पाण्याचे नियोजन कसे करणार. मी विकासाच्या विरोधात नाही, पण सध्याची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या पाणी वापराचे नियोजन कसे असणार आहे याची माहिती आम्हाला द्यावी.”
“एक जबाबदार नागरिक म्हणून सांगते, जेव्हा जेव्हा मी फिल्डवर जाते, तेव्हा लोक मला एकच म्हणतात. ताई आम्हाला पाणी पाहिजे, पाण्यासाठी आम्ही आमच्या भागात करोडो रुपये खर्च करतो, मग टँकरमधून पाणी येते तर आमच्या नळाला पाणी का येत नाही. कचरा का उचलला जात नाही, ट्राफिकचा प्रश्न का सुटत नाही, यांच्याकडे मेट्रोसाठी करोडो रुपये आहेत. मग आमच्या पाण्याचा योजनेसाठी तुमच्या पैसे का नाहीत. पाण्याचे नियोजन का होत नाही. गेल्या पाच ते सात वर्षात तुम्ही काय केले”, असा सवालही सुप्रिया सुळेंनी यावेळी उपस्थित केला.
“गेल्या दोन वर्षापासून निवडणुका न झाल्याने महापालिकेत नगरसेवक नाहीत. राज्य सरकार आणि प्रशासन यांना नागरिकांचे छोटे प्रश्न सोडविता येत नाहीत. फक्त कोट्यावधी रुपयांचे मोठे प्रकल्प केले जात आहेत. राज्य सरकार आणि पुणे अँडमिनिस्टेशनने पुण्यातील बांधकामे थांबवावी, बांधकामांचा आढावा घ्यावा, पुण्याच्या विकासावर एक वाईट पेपर काढावा आणि त्यानंतरच बांधकामांना परवानगी द्यावी”, अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.
पक्ष फोडण्यासाठी सत्ता नसते
“महापालिकेला घेराव घालण्याचा इशारा राजकारण करण्यासाठी देत नाही. मी सत्तेत असते तरी देखील माझे हेच मत असते. कारण, सत्ता ही केवळ लाल दिव्यासाठी नसते, पक्ष फोडण्यासाठी नसते, इनकम टॅक्स, ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करण्यासाठी नसते. तर नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असते. सत्ता हे एक साधन आहे. लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी सत्ता असते”, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.