संग्रहित छायाचित्र
गणेश विसर्जनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे दिव्याज फाउंडेशन दरवर्षी समुद्र किनारे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेते. या वर्षी देखील गणपती विसर्जनानंतर दिव्याज फाउंडेशनच्यावतीने बुधवारी (दि.१८) वर्सोवा बीचवर स्वच्छता मोहीम राबवली गेली. दरम्यान, अमृता फडणवीस यांनी याकामी पुढाकार घेतल्याबद्दल भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी अमृता फडणवीस यांचे कौतुक केले.
अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी बुधवारी सकाळी वर्सोवा येथे पोहोचल्या. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते. यावेळी बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी अमृता फडणवीस यांचं कौतुक केलं. अमृता फडणवीस यांनी राजकारणातील कचरा साफ करण्यासाठीही पुढाकार घ्यावा असं ते यावेळी बोलताना म्हटले.
लोढा म्हणाले, समुद्रकिनारी स्वच्छता मोहिम राबवण्यासाठी अमृता फडणवीस नेहमी पुढाकार घेतात. आता त्यांनी राजकारणातील कचराही साफ करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अमृता फडणवीस यांनी आईचं रूप घेतलं आहे. मुला-मुलींसाठी त्या जे काम करत आहेत, त्यामुळं मी आजपासून त्यांना मॅडम अमृता नाही तर माँ अमृता फडणवीस म्हणणार असल्याचं लोढा यांनी म्हटलं. त्यामुळे अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.