ओबीसींच्या लढ्याचा जनक मीच – प्रकाश आंबेडकर
‘आता परत मला इतिहास सांगयची गरज नाही. मंडल आयोगाबाबतचा इतिहास पाहा तुम्हाला कळेल. छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो. न्यायालयात पलटवार मीच केला. त्यांनी त्याबाबत कधी माझे आभार मांडले नाहीत. मला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. जरा इतिहास सुधारून घ्या. मग कळेल… ओबीसीचा लढ्याचा जनक मी आहे’, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
प्रकाश आंबेडकर आज पुणे दौऱ्यावर होते. स्त्री शिक्षणासाठी लढा उभारणारे महात्मा फुले यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यामुळ, पुण्यातील महात्मा फुले वाड्यात जात प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुलेंना अभिवादन केलं. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाचाही समाचार घेतला. कोणाचाही बाप संविधान बदलू शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आरआरएस किंवा विश्व हिंदू परिषद नसले म्हटले तरी फडणवीस यांनी जे वक्तव्य केले संविधान बदलणार नाही, पण जोपर्यत आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे वक्तव्य करत नाही. तोवर आम्ही मान्य करणार नाही.”
“२०२४ च्या निवडणुकीत देशातील सत्ता बदललेलं पण पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी राहणार नाहीत हे मात्र नक्की आहे. पंतप्रधान हे वेगळी भुमीका घेतात आणि परराष्ट्रमंत्री वेगळा निर्णय युद्धाबाबत घेत आहेत”, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “तीन दिवसापूर्वी मुस्लिम संघटना बैठक मुंबईमध्ये झाली. 8 डिसेंबरला मुस्लिम संघटना पॅलेस्टाईन विषय आझाद मैदानावर सभा घेणार आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आंतरराष्ट्रीय प्रश्नावर सामान्य माणसाने विचार करायला हवा. हा मुस्लिमांचा विषय आहे. म्हणून सोडून द्यायचं, असं भाजप सांगत आहे. सरळ प्रश्न आला. सरळ उत्तर येईल. पण मला प्रश्न येईल. तसं उत्तर देणार… एकदा बोललो की, बोललेलं विधान मी कधीच मागे घेत नाही. मागे घेणार नाही. राज्यात सध्या दंगली कधीही घडू शकतात.”