“वाघनखे राहू द्या…शिवस्मारकाचं बघा”; संभाजी ब्रिगेडचा भाजपला टोला
भाजप छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा नेहमी वापर करते. भाजप अडचणीत असली की छत्रपतींचे आठवण होते, असा घणाघात संभाजी ब्रिगेडकडून आता करण्यात आला आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा विषय चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
संतोष शिंदे म्हणाले की, सत्तेत यायचे असेल तर छत्रपतींचा आशीर्वाद लागतो आणि सत्ता उपभोगली की मग त्यांच्या विचारांचा विसर पडतो. सध्या भाजप विरोधात जनता भयानक संतापलेली असताना परत छत्रपतींच्या नावाचा आधार घेऊन भाजप सरकारला महागाई, बेरोजगारी ही जनतेला विसरायला लावायचे आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा विषय काढला जातो. पहिले अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक होणार होते त्याचे काय झाले ते सांगा, अगोदर शिवस्मारक करा विनाकारण लोकांची दिशाभूल करू नका, असा टोला संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी लगावला.