संग्रहित छायाचित्र
अजित पवार हे पार्थ यांचा पराभव विसरले असतील. परंतु पार्थ यांचा २०१९ चा मावळ लोकसभा मतदारसंघात झालेला पराभव मी विसरलो नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे (Maval Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांच्या प्रचारासाठी मंगळवाररी (दि. २३) रोहित पवार पिंपरी-चिंचवडला आले होते. यावेळी पिंपरी-चिंचवडमधील वातावरण मशालच्या बाजूनं वातावरण आहे. संजोग वाघेरे हे इथले नवे खासदार असतील, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
अजित पवार (Ajit Pawar) हे शरद पवारांना वडील म्हणून मानायचे. वडिलांना सोडून स्वत:चं साम्राज्य राखण्यासाठी, तसेच होणाऱ्या कारवायांपासून वाचण्यासाठी ते महायुती आणि भाजपसोबत गेले. त्यांनी इथे वडिलांचा विचार केला नाही. तसेच ज्या उमेदवाराने स्वत:च्या मुलाचा मोठ्या लीडने पराभव केला, ते विसरून त्याच उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी अजित पवार आले. यावरून त्यांची परिस्थिती काय आहे, हे लक्षात येते, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना चिमटा काढला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला होता. सोमवारी बारणे यांनी मावळ लोकसभेसाठी अर्ज भरला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.
रोहित पवार पुढे म्हणाले, ‘‘अजितद पवार या सगळ्या गोष्टी विसरले असतील परंतु मला पार्थला सांगायचंय मी ते विसरलो नाही. ज्या व्यक्तीने तुझा पराभव केला त्या व्यक्तीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी हा तुझा भाऊ इथं आला आहे. तसेच ज्या-ज्या कार्यकर्त्यांनी तुझा प्रचार केला होता ते कार्यकर्ते अजूनही शरद पवार यांच्यासोबत आहेत. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात आम्ही लढत आहोत.’’
पार्थ पवार यांच्या पराभवाचा बदला घेणार का, असे पत्रकारांनी विचारले असता रोहित पवार म्हणाले, ‘‘बदला घेण्यापेक्षा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना निवडून आणणे महत्त्वाचे आहे.’’
मागेपुढे दोन रणगाडे द्या - रोहित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा पुरवली आहे. याबद्दल रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘पार्थ पवार यांना खरं तर झेड दर्जाची सुरक्षा पुरवायला हवी होती. जी सुरक्षा पंतप्रधान मोदींना आहे, त्याच प्रकारची द्यायला हवी होती.’’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेत्याला सुरक्षा पुरवतात, नेत्यांच्या मुलांना, आमदारांना सुरक्षा पुरवतात पण जिथं कोयता गँग आहे, सामान्य लोक अडचणीत येतात, गोळीबार होतो, महिलांवर अत्याचार होतो त्याबद्दल ते काहीच करत नाही असे म्हणत त्यांनी फडणवीस यांच्यावरही टीका केली.
रोहित पवार पुढे म्हणाले, ‘‘मला वाटतं पार्थ पवार यांच्या मागेपुढे दोन रणगाडेच द्यायला हवे. कारण लोक महायुती आणि भाजपच्या विरोधात आहेत. तसेच भाजपचा नाराज कार्यकर्तासुद्धा काहीही करू शकतो. त्यामुळे दोन रणगाडे द्यायला काही हरकत नाही.’’