आता जे केलं ते २००४ सालीच करायला हवं होतं - अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडून पक्षासह पवार कुटुंबात उभी फुट पडली. तसेच बारामतीत शरद पवारांच्या कन्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघ आणि पवार कुटुंबातील फुट ही राजकीय चर्चेचा विषय बनून राहिली आहे. त्यातच आज (गुरुवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवारांसोबतचा त्यांचा राजकीय इतिहासच उलगडून दाखवला. अजित पवार इंदापूर येथे एका मेळाव्यात बोलत होते.
अजित पवार म्हणाले, या वयात मी साहेबांना (शरद पवार) सोडायला नको होते अशा चर्चा वारंवार सुरू असतात. परंतु मी साहेबांना कधीही सोडलेलं नाही. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते २०२३ पर्यंत साहेब म्हणतील ती पूर्व दिशा समजून त्यांचं सगळं ऐकलं. १९६७ साली साहेब पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले. त्या वेळी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना संधी दिली. पुढे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडलं आणि पुलोदचं सरकार बनवलं. त्यावेळी त्यांना संधी देणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांचं पवार यांनी ऐकलं नाही, असं अजित पवार म्हणाले.
अजित दादा म्हणाले, १९९९ साली शरद पवार यांनी सोनिया गांधी परदेशी असल्याचा मुद्दा उचलून धरला. त्यांनंतर त्यांना पक्षातून काढून टाकलं. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. परंतु काही कालावधीतच पवारांनी सोनिया गांधी परदेशी असल्याचा मुद्दा सोडून दिला आणि पुन्हा काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही काही बोलू शकत नव्हतो. ते म्हणतील ती पूर्व दिशा समजून आम्ही त्यांचं ऐकत आलो. शरद पवार यांच्या सर्व निर्णयांत मी आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी त्यांना साथ दिली.
अजित पवार पुढे म्हणाले, २००४ साली काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले. तेव्हा स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी तुमच्यातील मुख्यमंत्री कोण होणार अशी विचारणा केली होती. त्यावेळी छगन भुजबळ, आर. आर. पाटील की मी स्वत: यांच्यापैकी मुख्यमंत्री कोण होणार असे त्यांनी विचारले. असे असूनही उपमुख्यमंत्रीपद, तसेच चार मंत्रीपदं जास्त घेऊन मुख्यमंत्री पदावर पाणी सोडलं. त्यावेळी त्यांना कोणीही विरोध केला नाही. कारण साहेबांचा आदेश होता. परंतु आता कधीतरी असं वाटतं की जे आता केलं ते २००४ ला केलं असतं तर बरं झालं असतं.
तुम्ही केली ती स्ट्रॅटेजी आणि आम्ही केलं ते वाटोळं?
अजित पवार म्हणाले, २०१४ ला भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिल्याचे सांगण्यात आले. त्याबद्दल विचारले असता ही आपली स्ट्रॅटेजी असल्याचे सांगितले गेले आणि आम्हाला सर्वांना वानखेडे स्टेडियमवर शपथविधीसाठी पाठवले गेले. त्यामुळे यांनी केली ती स्ट्रॅटेजी आणि आम्ही केलं ती गद्दारी आणि वाटोळं केलं असं कसं? २०१७ मध्ये साहेब म्हणाले शिवसेना आम्हाला चालत नाही. तो खूप जातीवादी पक्ष आहे. २०१९ मध्ये दिल्लीत अमित शहा यांच्याशी चर्चा होवून सर्व मंत्रीपदे ठरवली गेली. त्यावेळी शाह म्हणाले होते, तुमचा पूर्वीचा अनुभव चांगला नाही. चर्चा एक होते आणि नंतर घडते दुसरेच. त्यावेळी मी त्यांना सांगितले मी शब्दाचा पक्का असून ठरल्याप्रमाणेच वागेन. परंतु मुंबईत परत आल्यावर साहेब म्हणाले आपल्याला शिवसेनेसोबत जायचे आहे. हे सरकार बनवताना पवारांचे मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी खटके उडाले. त्यांनंतर साहेब चिडले आणि आम्हाला म्हणाले तुम्हाला काय करायचे आहे ते करा. त्यांची संमती घेऊनच आम्ही वर्षावर जाऊन चर्चा केली. जयंत पाटील यांनाही याची पूर्ण कल्पना असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.