मोदींच्या 'भटकती आत्मा' टिकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले त्यांचं म्हणणं खरं आहे, पण...
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या 'भटकती आत्मा' टीकेला पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझा आत्मा अस्वस्थ असून पंतप्रधानांचं खरं आहे. परंतु माझा आत्मा स्वत:च्या स्वार्थासाठी अस्वस्थ नसून शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि महागाईने त्रस्त असलेल्या लोकांसाठी अस्वस्थ असल्याचे सांगत पवारांनी पंतप्रधानांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं. ते शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत बोलत होते.
पवार म्हणाले, एकेकाळी पंतप्रधान मोदींनी पवारांच्या बोटाला धरून राजकारणात आलो असे जाहीर भाषणात सांगितले होते. परंतु हल्ली पंतप्रधानांचा माझ्यावर राग आहे. त्यांनी भाषणातून महाराष्ट्रात एक अंतरात्मा असल्याचं सांगितलं. हा अंतरात्मा अस्वस्थ असून गेली ४५ वर्षे अस्वस्थता निर्माण करतोय. सरकारला अडचणीत आणतोय. या आत्म्यापासून सुटका करून घ्यायची गरज आहे. मी त्यांचं भाषण वाचलं आणि टीव्हीवर ऐकलं.
पवार पुढे म्हणाले, माझा आत्मा अस्वस्थ आहे. हे खरं आहे. परंतु स्वत:च्या हितासाठी नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दुखणं बघून अस्वस्थ आहे. आज देशात महागाई वाढली आहे. लोकांना संसार करणं अवघड झालं आहे. त्यासाठी आत्मा अस्वस्थ आहे. त्यांच्या अडचणी सोडवणे हे माझं कर्तव्य आहे. माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहे, असं म्हणत पवारांनी मोदींच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं.