'अतृप्त आत्म्यामुळे' महाराष्ट्र अस्थिर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवारांवर हल्लाबोल
आपल्याकडे म्हणतात काही अतृप्त आत्मे असतात. त्यांची स्वप्न पूर्ण झाली नाही तर ते दुसऱ्याच्या स्वप्नांमध्येही माती कालवतात. ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर केला.
पुण्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा रेसकोर्स येथे झाली. यावेळी मोदींनी शरद पवार (Sharad Pawar), राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवारांवर बोलताना मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक मुख्यमंत्री या अतृप्त आत्म्यामुळेच आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. हे फक्त विरोधी पक्षालाच अस्थिर करत नाही, तर आपल्या पक्षात, कुटुंबातही ते असंच करतात. १९९५ मध्येही हा अतृप्त आत्मा शिवसेना भाजपाचं सरकार अस्थिर करू पाहात होता. २०१९ मध्ये या अतृप्त आत्म्याने काय केलं ते महाराष्ट्राला माहीत आहेच. आता देश अस्थिर करण्याचा प्रयत्न या अतृप्त आत्म्याने सुरू केला आहे.
राहुल गांधींवर (Rahul Gandhi) टीका करताना मोदी म्हणाले, भाजपासह (BJP Pune) महायुती सरकार महाराष्ट्राला पुढे नेत आहे. देशाला पुढे नेत आहेत. मात्र दुसरीकडे इंडिया आघाडी काँग्रेसच्या शहजाद्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना विचारा, गरिबी कशी हटते तर ते म्हणतात खटाखट, खटाखट. युवराजांना विचारा विकसित भारताची योजना काय, तर ते म्हणतात टकाटक टकाटक. ज्यांनी कॉंग्रेस पक्षासाठी आपल्या आयुष्याची १५ -२० वर्षे दिली, ते लोक या युवराजांमुळेच पक्ष सोडून जात आहेत.
मोदी म्हणाले, २०१४ च्या आधी दहा वर्षांत तुमच्याकडून महागाई आणि भ्रष्टाचारासाठी डबल टॅक्स वसूल केला गेला. २०१४ नंतर आम्ही महागाईही आटोक्यात आणली. भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई केली. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. दहा वर्षांमध्ये कर चुकवणाऱ्यांना आम्ही सवलती दिल्या नाहीत. सात लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं. त्यामुळे देशभरातल्या करदात्यांची अडीच लाख कोटींची बचत झाली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंब आनंदात आहेत.
पुण्यातल्या या भूमीत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारखे समाजसुधारक देशाला दिले आहेत. पुणे हे जितकं प्राचीन आहे तितकंच ते सुधारणावादीही आहे असे सांगून मोदी म्हणाले, पुण्यात प्रत्येक क्षेत्रातले उत्तम लोक आहेत. म्हणूनच तर म्हणतात की पुणे तिथे काय उणे? काँग्रेसने देशावर साठ वर्षे राज्य केलं. मात्र काँग्रेसच्या काळात देशातल्या अर्ध्या जनतेकडे मूलभूत सोयी सुविधा नव्हत्या. आत्ता आम्हाला फक्त १० वर्षे तुमची सेवा करण्यासाठी मिळाली आहेत. मात्र या दहा वर्षांत आम्ही मूलभूत गरजा पूर्ण केल्या आहेत. शिवाय प्रत्येक वर्गातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण कशा होतील याकडे लक्ष केंद्रित केलं. एक व्हिजन घेऊन आम्ही काम करतो आहोत. कुणी शहरात असो की गावात, चांगले रस्ते, उत्तम पायाभूत सुविधा पाहून त्या माणसांचं मन प्रसन्न होतं. (PM Modi in Pune)
पुणे मेट्रो, पालखी मार्ग, समृद्धी महामार्ग, पुणे विमानतळाचा विकास, हायस्पीड वंदे भारत ट्रेन हे सगळं पुण्यात आहे आणि आधुनिक भारताचं हे चित्र आहे. पुणेकरांनो लिहून घ्या, महाराष्ट्रातल्या लोकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही लवकरच बुलेट ट्रेनमध्ये प्रवास कराल. ही मोदींची गॅरंटी आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार रिमोटवर चालणारं सरकार होतं. त्या सरकारने दहा वर्षांत जितके पैसे खर्च केले, ते आम्ही एका वर्षांत खर्च करतो. काँग्रेसच्या काळात आपल्याला मोबाइल आयात करावे लागत होते आता आपण निर्यात करतो आहोत. भाजपाने खूप चांगली कामं युवकांसाठी केली आहेत. तसंच समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी केली आहेत. आयुषमान योजनेच्या अंतर्गत जनऔषधी केंद्रही आम्ही सुरू केली आहेत. त्यामध्ये ८० टक्के सवलतीच्या दरांत औषधं विकली जातात. गरीब आणि मध्यमवर्गीयांना स्वस्तात औषधं मिळतात. यातून देशभरात मध्यमवर्गीय, गरीब यांचे दीड लाख कोटी रुपये वाचले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुती नसून मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. करोडो रामभक्तांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले. विकासाचे दुसरे नाव मोदी आहे, २०१४ नंतर देशात भ्रष्टाचार झाला नाही. इथे फक्त मोदींची गॅरंटी चालते. मोदींकडे विकसित भारताचा अजेंडा आहे आणि विरोधकांकडे बोंबाबोंब, भ्रष्टाचार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, उध्दव ठाकरे यांच्या गाडीमध्ये केवळ आदित्य ठाकरेंसाठी जागा आहे. शरद पवारांच्या गाडीमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासाठीच जागा आहे. मात्र, महायुतीची गाडी ही सर्वांसाठी आहे.