संग्रहित छायाचित्र
बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हाती घेतली असून त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पायाखालील वाळू सरकली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बुथ बारामतीत लागू न देण्याचा निरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिला गेला असल्याचा आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. परंतु अशा धमक्यांना निष्ठावंत आणि स्वाभिमानी लोक भीक घालणार नसल्याने, विचारपूर्वक पावलं उचलण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
बारामती लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या नणंद भावजय आमने-सामने आहेत. राजकारणासोबतच पवार कुटुंबातही संघर्ष वाढला असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागून राहिले आहे. तसेच अनेकदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर ते धमक्या देत असल्याचे आरोप करण्यात आले आहे. त्यातच आज (शनिवारी) ट्विट करून थेट रोहित पवार यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.
नक्की काय म्हणाले रोहित पवार?
बारामतीची निवडणूक स्वाभिमानी सामान्य लोकांनी हातात घेतल्याने बळकावलेल्या राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकलीय. त्यामुळं ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाचे बुथही बारामती मतदारसंघात लागले नाही पाहिजेत, असे निरोप घाबरलेल्या अजितदादांच्या पक्षाकडून मलिदा गँगसह दुष्प्रवृत्तीच्या लोकांमार्फत देण्यात येतायेत. पण या मलिदा गँगला एकच सांगतो, ‘‘सत्तेच्या बळावर तुम्ही देत असलेल्या धमकीला निष्ठावंत आणि स्वाभिमानी सामान्य लोक भीक घालणार नाहीच पण उद्या आमच्या हाती सत्ता येणार आणि तेंव्हा गाठ आमच्याशी असेल! त्यामुळं नीट विचार करा.’’