काही कोटी लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल – चंद्रकांत पाटील
मनोज जरांगे यांनी मांडलेल्या बहुतांश मागण्या पूर्ण होत चालल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून जरांगे यांच्या उपोषणाची सुरुवात झाली, पण समाज म्हणून प्रमाणपत्र मिळण्याची मागणी झाल्यावर सरकारने समिती नेमली. त्यामुळे आता काही कोटी लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल. त्यामुळे जरांगे पाटील समाधानी आहेत, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ज्याची नोंद सापडणार नाही त्यांना प्रमाणपत्र मिळणार नाही. खोटी प्रमाणपत्रे दिली तर प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वतःचे कुणबी प्रमाणपत्र, मग कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र आणि आता सरसकट कुणबी प्रमाणपत्र असा जरांगे यांच्या मागण्यांचा प्रवास राहिला आहे. कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळत नाही असे त्यांचे जे मत आहे, त्याबाबत त्यांचे आता बरेच समाधान झाले आहे, असे माझे मत आहे. आतापर्यंत काही लाख नोंदी सापडल्या आहेत. पण या नोंदी काही लपवून ठेवलेल्या नव्हत्या. साधारणपणे वैयक्तिक मागणी केल्यावर असे प्रमाणपत्र मिळते. पण समाज म्हणून प्रमाणपत्र मिळण्याची मागणी झाल्यावर सरकारने समिती नेमली. त्यामुळे आता काही कोटी लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल. म्हणून जरांगे पाटील समाधानी आहेत.
ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगून पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा कायदा करावा लागेल. वेगळं अधिवेशन घेऊन ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत नाहीत त्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा केला जाईल. बनावट कागदपत्रांची घटना झाली तर कारवाई आणि शिक्षा केली जाईल.
भाजपा आमदार रिपोर्ट कार्डबाबत पाटील म्हणाले, फक्त पुण्यातून नव्हे तर संपूर्ण राज्यातील सगळ्या लोकांचा कामगिरी अहवाल (परफॉर्मन्स कार्ड) मागितले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, महापौर ,आमदार, खासदार या सगळ्या लोकांची कामगिरी पक्ष तपासत असते. कारण पार्टीचा हा आग्रह आहे की, निवडणुकीपुरती लोकांची कामे न होता सतत आमच्या लोकांनी समाधान देणारी कामे करावी. खासदारांच्या निलंबनाचे पडसाद लोकसभा निवडणुकीत दिसतील, असे पवार म्हणत असल्याच्या या प्रश्नावर पाटील म्हणाले की, आशावादी राहणे माणसाला दिलेला नैसर्गिक गुण आहे. तसाच तो पवारांमध्येही आहे. असे होईल तसे होईल, बघत राहा असे म्हणावे लागते.
पत्रकार परिषदेत नोकरीबाबत प्रश्न, पाटील यांनी पोलिसांना दिले चौकशीचे आदेश
चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद सुरू असताना अंबेजोगाई येथील ३५ वर्षीय शिवराज मोहन ठाकूर या तरुणाने स्पर्धा परीक्षा देणार्या तरुणांबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात तू कोण आहेस, पत्रकार नसशील तर बाजूला होण्यास पाटील यांनी सांगितले. संबंधित तरुणाची पोलिसांना चौकशी करण्यास सांगितले. पोलिसांनी त्या तरुणाची चौकशी करून त्याला नंतर सोडून दिले.