नितेश आणि निलेश राणे यांच्यावर बंदी आणावी, भाजपच्याच नेत्याने केली मागणी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नितेश राणे यांनी जोरदार टीकास्त्र डागले होते. नितेश राणे हे शरद पवारांविषयी बोलताना म्हणाले होते की "कधी कधी वाटते की औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार" असे वक्तव्य त्यांनी केल्यामुळे गुरुवारपासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेले पहायला मिळत होते. अनेक ठिकाणी नितेश राणे यांचे पुतळे दाखल राष्ट्रवादीने आंदोलन देखील केलेली होती.
दरम्यान, आता भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. नितेश राणे व निलेश राणे हे पातळी सोडून बोलत असतील तर पक्षाने त्यांच्यावर बंदी आणावी, अशी मागणी त्यांनी केली. संयज काकडे यांनी भाजपलाच घरचा आहेर दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
संजय काकडे यांनी पत्रकार परिषद घेत निलेश व नितेश राणे या दोघंही भावंडांचा समाचार घेतला आहे. काकडे म्हणाले की, “कोणताच पक्ष विरोधी पक्षाला बोलण्यासाठी खालच्या स्तरावर जाऊन बोला असे सांगत नाही. अशा प्रकारच्या खालच्या स्तरावर जाऊन कोणी वक्तव्य करत असेल तर त्याच्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करतो. तसेच नितेश राणे यांच्यावर बंदी घालण्यासाठी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच जेपी नड्डा व अमित शहा यांना पत्र लिहिणार आहे”, असे देखील यावेळी संजय काकडे म्हणाले.