संग्रहित छायाचित्र
नव्वदच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींचे नाव घेतले तर त्यात मनिषा कोईरालाचाही उल्लेख आवर्जून करावा लागेल. 'सौदागर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मनिषा कोईरालाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. मधल्या काळात मनिषा कोईराला बॉलिवूडमधून गायब झाली होती. कॅन्सर झाल्याने तिचा आयुष्याशी संघर्ष सुरु होता. आता 'हिरामंडी' वेब सीरिजमधून मनिषाने दमदार पुनरागमन केले आहे. मनिषाने एका मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ९० च्या दशकात चित्रपटसृष्टीत असे अनेक समज होते ज्यामुळे आपल्याला त्रास होत होता, मग ते ड्रिंकिंग असो किंवा अफेअर अशी खंत तिने व्यक्त केली आहे.
बॉलिवूडमध्ये नेहमीच पुरुष आणि महिलेमध्ये फरक केला जातो. ज्या गोष्टी पुरुषाने केल्यानंतर त्याच्याकडे 'माचोमॅन' म्हणून पाहिले जाते, त्याच गोष्टी महिलेने केल्यास तिच्याकडे तुच्छतेने पाहिले जाते, अशी खंत मनिषाने व्यक्त केली आहे. मनिषा म्हणाली की, "मला त्यावेळी फार टीकेचा सामना करावा लागला होता याचे कारण त्यावेळी हिरोच्या अनेक प्रेयसी असल्या तरी चालत होते आणि त्यांना माचोमॅन म्हटले जायचे. पण अभिनेत्रीला हे शोभायचे नाही. आमच्यासाठी म्हटले जायचे की, 'नाही, नाही कोणी मला हात लावू शकत नाही' आणि आम्ही जणू काही अस्पृश्य. आहोत. ही फार सहज उपलब्ध होणारी मुलगी आहे असेही समजले जायचे. पण मी माझ्या हिशोबाने जगले. माझे खासगी आयुष्य आहे किंवा माझा प्रियकर आहे याचा अर्थ हे नाही की मी अनप्रोफेशनल आहे. मला माझे काम आवडते. आमच्याकडे अभिनेत्रींचा मान राखण्याचे काही अतिशय संकुचित मार्ग होते, जे मला मान्य नव्हते.
'सौदागर' चित्रपटाच्या पार्टीदरम्यान मी कोक आणि वोडका एकत्र करून पित होते. मला माझ्या आसपासच्या लोकांनी तू कोणलाही वोडका पित आहेस हे सांगू नकोस, कारण अभिनेत्री दारु पित नाहीत असे सांगितले. मी फक्त कोक पित आहे असे सांग, असा सल्ला देण्यात आला. माझ्यासाठी ती फार नवी गोष्ट होती. मी नवीन काहीतरी शिकले होते. म्हणून मी माझ्या आईला सांगितले, 'मी कोक पीत आहे', आणि तिला माहित होते की मी त्यात वोडका टाकला आहे. ती म्हणाली, 'ऐक, जर तू वोडका पीत आहेस, तर सांग मी वोडका पीत आहे, खोटे बोलू नकोस. 'तुम्ही कोक पीत आहात' यासारख्या छोट्या गोष्टींबद्दल खोटे बोलू नकोस. जर मी एखाद्याला डेट करत असेन तर हो डेट करते. जर तुम्हाला मला जज करायचे असेल तर करु शकता. पण मी अशीच आहे आणि माझ्या अटींवर आयुष्य जगते, असे मनिषाने सांगितले. मनिषाने 'सौदागर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिचे नाव विवेक मुश्रानशी जोडले गेले होते. नाना पाटेकर यांच्याशीही तिचे अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. मनिषाने सम्राट दहलशी लग्न केले होते, पण नंतर ते वेगळे झाले होते.