आपणच आपल्या जिवाची काळजी घेतली पाहिजे’
ओश्विन कढव
वाहतुकीचे नियंत्रण करणे हे सर्वाधिक कठीण काम असल्याचे डॉ. अनघा गोंदेकर सांगत होत्या. बालेवाडीच्या रहिवासी असलेल्या डॉ. गोंदेकर या बाणेर-बालेवाडी धावपटू गटातील सदस्यांसमवेत रस्त्याचे राजे बनल्या होत्या. ‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’ ने पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने हाती घेतलेल्या ‘ जरा देख के चलो ’ या आगळ्या उपक्रमात सहभागी झाल्यानंतर आलेले आपले अनुभव त्या सांगत होत्या. डॉ. गोंदेकर म्हणाल्या की, आपल्या जिवाची आपण जशी काळजी घेतो, तशीच काळजी इतरांच्या जिवाची घ्यावयास हवी. जे वाहतुकीचे नियम मोडतात, त्यांनी आता अधिक जबाबदार होण्याची आणि दक्ष राहण्याची गरज आहे.
डॉ. गोंदेकर यांच्या समवेत त्यांच्या गटातील आठ सदस्य रस्त्याचे राजे बनले होते. ते कॅम्पेनचा टी-शर्ट घालून, हातात शिट्टी घेऊन रविवारी बालेवाडीच्या चौकात उतरले होते. त्यांचा उद्देश होता पुण्यातील वाहतूक अधिक चांगली बनवण्याचा. धावपटू आणि आयटी क्षेत्रात कार्यरत असलेले विवेक साळवी म्हणाले की, या उपक्रमात सहभागी होणे हा आमच्यासाठी नवीन काही तरी शिकण्याचा अनुभव होता. दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. ‘मिरर’च्या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होता आले त्याबद्दल मला अभिमान वाटतो.
पुणे खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी व्हावे असे वाटत असेल तर वाहतूक पोलिसांचा सन्मान करणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे हे जबाबदार नागरिकांचे कर्तव्य असल्याचे मत बाकीच्या स्वयंसेवकांनी व्यक्त केले. तसेच या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळवून दिल्याबद्दल त्यांनी ‘मिरर’ चे आभार मानले