अब्दुल सत्तार
“रोज सकाळी उठतो आणि भुंकतो, तो कुत्रा असेल तर त्याला आमच्या मतावर आम्ही राज्यसभेवर पाठवले, कुत्र्याची अवस्था त्याची झालेली आहे आमची नाही, तो महाकुत्रा आहे. तो कुत्र्याची नाही जर माणसाची अवलाद असेल तर त्याने राजीनामा द्यावा”, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांना उत्तर देताना कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांची जीभ घसरली आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी दैनिक सामनामध्ये छापण्यात आलेल्या अग्रलेखाबद्दल सत्तारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सत्तार म्हणाले की, “त्याच्यापेक्षाही वाईट शब्द आम्हाला बोलता येतात. आमच्या मतावर तो राज्यसभेवर गेला आहे, तो महाकुत्रा आहे. तो कुत्र्याची नाही जर माणसाची अवलाद असेल तर त्याने राजीनामा द्यावा, तो कसा आहे ते कळेल. राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावे, त्याने राजीनामा दिला तर मी पण राजीनामा देईल.”
पुढे अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबद्दल बोलताना सत्तार म्हणाले की, “सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे. आणखी ४ दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे अस्मानी संकट आहे, कोणीही राजकारण करू नये. बदलत्या हवामानाप्रमाणे नवीन काही पीक घेता येईल का? यावर विचार सुरू आहे. अवकाळीने नुकसान झालेल्या शेतीचे ८२ टक्के पंचनामे झाले आहेत. लवकरच त्याच्या खात्यावर आर्थिक मदत पोहोचेल”, असेही सत्तार यावेळी बोलताना म्हणाले.