संग्रहित छायाचित्र
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव अशी ओळख असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या माध्यमातून पुण्यात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या सेवेचा हजारो वारकरी मंडळींनी लाभ घेतला.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू संतश्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात मुक्कामासाठी आगमन झालं. दोन्ही पालख्या दोन दिवस पुण्यात मुक्कामी असल्याने पुणेकरांनी मोठ्या उत्साहात पालख्यांचं स्वागत केलं. पालख्यांसोबत असलेल्या वारकऱ्यांमुळे संपूर्ण शहरातील वातावरण हे भक्तिमय झाले होते. विविध मंडळे, संस्था, संघटनांकडून वारकऱ्यांची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करण्यात आली. ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’नेही मंदिरापुढे वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. यावेळी दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनीही वारकऱ्यांना भोजन देत त्यांची सेवा केली.
दरम्यान, मुंबई येथील लिव्हर ट्रान्स्प्लान्ट स्पेशालिस्ट डॉ. कैलास जवाडे हे आपल्या सहकाऱ्यांसह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यासोबत पुणे ते जेजुरीपर्यंत तर तुकोबांच्या पालखीसोबत पुणे ते अकलूजपर्यंत पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा आणि चरण सेवा (मालिश) देणार आहेत. त्यांच्यासाठी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या माध्यमातून आवश्यक ती औषधे उपलब्ध करून देण्यात आली.
महाराष्ट्राला पंढरपूरच्या वारीची मोठी परंपरा आहे. लाखो वारकरी भक्तिभावाने पालख्यांसोबत पंढरपूरला श्री विठुरायाच्या दर्शनासाठी पायी जात असतात. श्री विठ्ठलाच्या रुपातील वारकऱ्यांची भोजन सेवा आणि त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी औषधं उपलब्ध करून देण्याची संधी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ला मिळाली, हे आमचं परमभाग्य आहे.
- पुनीत बालन, (विश्वस्त आणि उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)