भुयारी पादचारी मार्ग; 'असून अडचण नसून खोळंबा'
विमाननगर चौकातील भुयारी पादचारी मार्गात गुडघ्यावर पाणी साचले असून हा मार्ग वापरात येत नसल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडायला लागत आहे.महापालिकेने इथे काही वर्षांपूर्वी पादचाऱ्यांची सोय व्हावी यासाठी भुयारी पादचारी मार्ग उभारला आहे. मात्र हा मार्ग पादचाऱ्यांसाठी गैरसोयीचा ठरला आहे. ईच्छा असूनही गुडघाभर दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे पादचाऱ्यांना या भुयारी मार्गाचा वापर करणे शक्य होत नाही.
मागील तीन आठवड्यांपासून या भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचले आहे. या पाण्याची प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. हे पाणी नेमके पावसाचे आहे की ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे साचले आहे, हे स्पष्ट झालेले नाही. विमाननगर चौकातील पादचारी मार्ग वडगाव शेरी तसेच विमाननगर तसेच बीआरटीचे प्रवासी रस्ता ओलांडण्यासाठी करत असतात. इथून हजारो नागरिक रोज ये-जा करत असतात. मात्र गेल्या तीन आठवड्यांपासून पादचारी मार्गात पाणी साचले असून, ते अजून काढण्यात आले नाही. त्यामुळे इथे कचरा आणि पाण्याने दुर्गंधी पसरली आहे. या चौकात प्रचंड वर्दळ असते, त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघात होण्याची दाट शक्यता असते. नागरिक जीव मुठीत घेऊन हा भला मोठा चौक ओलांडण्याचा प्रयत्न करतात. काहीजण तर बीआरटीच्या रेलिंगवरून उड्या मारून रस्ता ओलांडत असतात. त्यामुळे अपघातांची शक्यता असते.
काही जण अक्षरशः येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांच्या जवळून रस्ता क्रॉस करताना आढळून आले आहेत. महिला असो ज्येष्ठ नागरिक असोत, लहान मुलांना रस्ता ओलांडणे शक्य होत नाही. महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना रोज असा जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असल्याची भावना स्थानिक नागरिक श्रीकांत गुडमिट्टी यांनी 'सीविक मिरर' शी बोलताना व्यक्त केली आहे. वारंवार तक्रार करूनसुद्धा महापालिकेने याकडे लक्ष दिले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या रस्त्यावरून प्रवास करणारे नयन नायडू म्हणाले की, तीन आठवड्यांपासून या पाण्यामुळे डास, मच्छर होऊ लागले आहेत, त्यामुळे लोक आजारी पडण्याची दाट शक्यता आहे. महापालिकेने त्वरित याकडे लक्ष देऊन या भुयारी पादचारी मार्गाची स्वच्छता करावी.