भोरमधील वरंधा घाट तीन महिने वाहतुकीसाठी बंद राहणार !
पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता असल्याने भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाट अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबत रायगड-अलिबागच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत. आता प्रवाशांना ताम्हिणी घाटमार्गे लांबचा रस्ता धरावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच दमछाक होणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर-महाड रस्ता १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यातही हा मार्ग बंद राहिला होता. आदेशानुसार वाहनचालकांनी आदेशाचे पालन करणे आवश्यक असून, त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही महाड पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
महाड एमआयडीसी पोलिसांकडून घाट बंदचा फलक महाडमधील राजेवाडी येथील भोर फाट्यावर लावण्यात आला आहे; परंतु भोर प्रशासनाकडून याबाबत काही हालचाली दिसत नसून भोर मार्गावरून कोकणात जाणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय होणार आहे.