कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी राज्य सरकारकडून १४० कोटीचा निधी पालिकेच्या खात्यावर जमा
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मंजूर केलेली १४० कोटी रुपयांची रक्कम लवकर न मिळाल्याने राज्य सरकारविरोधात पुणेकर संताप व्यक्त करीत होते. विधानसभा निवडणूक जवळ आली असताना याचा फटका बसून नये म्हणून सोमवारी (दि. १) सरकारकडून १४० कोटी रुपये पुणे महापालिकेच्या खात्यावर जमा करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने नागरिकांना खूश करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी १४० कोटी रुपये महापालिकेला देण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली होती. हा निधी लगेच येईल, असे महापालिकेला वाटले होते. मात्र निधी महापालिकेच्या खात्यात जमा होत नसल्याने राज्य सरकारवर टीका केली जात होती. तसेच राज्य सरकारला जाग येत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला जात होता. आता हा निधी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदारांना खूश करण्यासाठी महापालिकेच्या खात्यावर जमा केली जातील, अशी चर्चा सुरू असताना त्यापूर्वीच सोमवारी महापालिकेच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेने या रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन करताना जागामालकांना पैसे दिले जातील, याचे लेखी आश्वासन दिले होते. त्या आधारावर अनेक जागामालकांनी जागेचा ताबा महापालिकेला दिला होता. आता त्या जागामालकांचे पैसे दिले जाणाार आहेत. तसेच भूसंपादन करताना प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. ज्या ठिकाणावरील जागा ताब्यात घेतल्यानंतर वाहतुकीवर मोठा परिणाम होईल, अशाच जागेचा ताबा घेण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच रस्त्याच्या कामाचे नियोजन केले जाणार असून येत्या काही दिवसात रस्त्याच्या कामाला वेग येणार आहे, असे पथ विभागाचे प्रमुख अनिरुध्द पावसकर यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते २०१९ मध्ये झाले आहे. या रस्त्यासाठी निधी मंजूर होऊन वेगाने काम पूर्ण केले जाईल, असे सांगण्यात आले होते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्याचे काम संथ गतीने सुरू होते. त्यावेळीदेखील अपघातांचे सत्र सुरूच होते. अलीकडच्या काळात निधी नसल्याने रस्त्याचे काम बंद पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या केवळ एक दिवस आधी हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याने निधी महापालिकेच्या खात्यावर जमा होईल, असा दावा करण्यात आला होता. परंतु याबाबतचा केवळ शासन आदेश जारी केला होता. एकही रुपया जमा झालेला नव्हता. राज्य सरकारच्या विभागातून पैसे पाठवण्यात आले असल्याचे सांगितले जात होते, पण पैसे नेमके कोठे अडकले? कोणी अडवून ठेवले, याची माहिती महापालिकेच्याच अधिकाऱ्यांना समजत नव्हती. त्यामुळे राज्य सरकारकडून पैशांचे गाजर दाखविले की काय, अशी चर्चा रंगली होती.
कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादनासाठी पुणे महापालिकेने २०० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र राज्य सरकारने केवळ १४० कोटी रुपये निधी देण्याची मान्यता मंत्रिमंडळात देण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या रस्त्याची पाहणी केली होती. वाढती वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे रुंदीकरणाचे काम वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच जे नागरिक जमीन देण्यास नकार देत होते. त्यांची समजूत काढून त्यांना मोबदला देण्यासाठी राज्य सरकारने निधी देण्याचे जाहीर केले होते. या रस्त्यासाठी आचारसंहितेनंतर निधी दिला जाईल असे सांगण्यात आले होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असल्याने मतदारांना खूश करण्यासाठी निधीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. परंतु त्यानंतर शासन आदेश आला पण निधीच जमा झाला नव्हता.
दक्षिण पुण्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रुंदीकरण करण्यात येणार आहे. पुणे शहराच्या मंजूर विकास योजना आराखड्यामध्ये ८४ मीटर रुंदीचा विकास योजना रस्ता (कात्रज-कोंढवा) दर्शविलेला आहे. कात्रज कोंढवा रस्त्याचे ८४ ऐवजी आता ५० मीटर रुंदीकरण केले जाणार आहे. यामुळे भूसंपादनाचा खर्च २८० कोटी रुपये इतका येणार होता. त्यानुसार २०० कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे केली होती. मात्र राज्य सरकारने २०० कोटी ऐवजी १४० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असणार्या जागेच्या भूसंपादनात अनंत अडथळे येत होते. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जागामालकांशी थेट संवाद साधून त्यांना मोबदला कसा दिला जाणार, याची सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यानुसार जागामालकांना महापालिकेने पत्र दिले असून जागा ताब्यात घेऊन रस्त्याचे काम सुरू केले होते.
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाकडून १३९.८३ कोटी रुपये महापालिकेला मिळाले आहेत. भूसंपादन केलेल्या जागेवर तत्काळ रस्ता तयार करण्याच्या कामाला वेग येईल. मंगळवारी (दि. २) पथ विभागाची बैठक होणार असून यामध्ये नियोजन केले जाणार आहे. प्राधान्यक्रम ठरवून रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल. चार लाख स्क्वेअर फूट इतके भूक्षेत्र संपादित करून घ्यायचे आहे. राज्य सरकारने दिलेला निधीसह महापालिकेने ७५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रस्त्याचे ४० टक्के काम झाले आहे. जे काम बाकी आहे, त्यापैकी ५० टक्के काम पूर्ण करता येईल.
- अनिरुध्द पावसकर, पथ विभाग प्रमुख, पुणे महापालिका