जखमींना पुन्हा जीवदान, वनविभागाने प्राण्यांना सोडले जंगलात
महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जखमी झालेल्या प्राण्यांना जीवदान मिळाले आहे. वन्यजीव एसओएस आणि महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जखमी प्राण्यांना उपचारानंतर जंगलातील निसर्गाच्या सानिध्यात सुखरूप सोडले आहे. महाराष्ट्रातील विविध भागात जखमी झालेल्या प्राण्यांवर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या माणिकडोह बिबट्या बचाव केंद्रात उपचार सुरू होते.
जंगलात सोडलेल्या प्राण्यांमध्ये एक भारतीय चिंकारा, माकड आणि कोल्ह्याचा समावेश आहे. आठ दिवसापुर्वी यातील चिंकारावर पुण्यातीले वेल्हे येथे मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे चिंकारा जखमी झाला होता. त्याचे वय साधारण ८ ते ९ महिन्याचे होते. जखमी झाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चिंकारावर सुमारे आठ दिवस उपचार केले. त्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात आले आहे.
तर दुसऱ्या घटनेत १७ वर्षीय माकड खेड येथे रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत मिळून आले होते. वाघुले येथे एका कोरड्या विहिरीत पडल्याने कोल्हा जखमी झाला होता. मात्र, यात त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याने अधिकाऱ्यांनी जंगलात सोडून दिले. याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सावने म्हणाले की, “आम्ही जखमी प्राण्यांवर सातत्याने लक्ष ठेवून होतो. विशेष काळजी घेवून जखमी प्राण्यांना उपचारानंतर जंगलात सोडण्यात आले आहे. या प्राण्यांना सुरक्षित ठेवणे, हेच आमचे ध्येय होते.”