गणेशोत्सवात १५६ विशेष रेल्वे गाड्या धावणार
चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आगामी गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी १५६ गणपती विशेष रेल्वे गाड्या धावणार आहे. मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. पुणे ते कुडाळ, मुंबई ते सावंतवाडी, पनवेल ते कुडाळ अशा कोकणात धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या सुरू करणार आहेत.
यंदा सप्टेंबर २०२३ मध्ये गणेशोत्सव सण आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणात जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वेत चाकरमान्यांना जागा मिळत नाही. प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी मध्ये रेल्वेने १५६ गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये मुंबई ते कुडाळा अशा एकूण २४ गाड्या धावणार आहेत. तर मुंबई ते सावंतवाडी रोड अशा एकूण ४० गाड्या, करमाळी-पनवेल-कुडाळा अशा एकूण ६ गाड्या, दिवा ते रत्नागिरी स्पेशल अशा एकूण ४० गाड्या, मुंबई ते माडगाव अशा एकूण ४० गाड्या आणि पुणे-करमाळी / कुडाळ-पुणे विशेष अशा एकूण ६ गाड्या धावणार आहेत.
यामध्ये पुणे ते करमाळी या मार्गावर धावणारी गाडी क्रमांक ०११६८ ही विशेष गाडी १५ सप्टेंबर, २२ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबर २०२३ रोजी पुण्याहून सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता कुडाळला पोहोचेल.
तर गाडी क्रमांक ०११७० स्पेशल कुडाळहून १७ सप्टेंबर, २४ सप्टेंबर आणि १ ऑक्टोंबर रोजी दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. या गाड्यंना लोणावळा, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग, असे थांबे असतील. तर गाडीत एक एसी २ टियर, ४ एसी ३ टियर, ११ स्लीपर क्लास, २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ जनरल सेकंड क्लास डब्बे असणार आहेत.