पुण्यातून या तीन आमदारांची नावे चर्चेत
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करू असे सांगितले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात पुण्यासाठी दोन मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. मंत्रिपदासाठी पुण्यातील तीन आमदारांच्या नावाची चर्चा आहे.
राज्य सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यास पुणे जिल्ह्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची अपेक्षा आहे. यासाठी माधुरी मिसाळ, राहुल कुल, महेश लांडगे यांची नावे समोर आली आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपुर्वीच राहुल कुल यांची भेट घेतली होती. मंत्रिमंडळ विस्तारात आगामी निवडणुका लक्षात घेऊन ग्रामीण आणि शहरी भागाचा समतोल साधेल, अशा पद्धतीने वाटप केले जाणार आहे.
तसेच शिंदे गटातून अनिल बाबर, भरत गोगावले, संजय रायमुलकर, अपक्ष आमदार बच्चू कडू, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि योगेश कदम यांच्या नावांचीही चर्चा आहे. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासूनच आमदार बच्चू कडू यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आले आहे. बच्चू कडू यांनीही याबाबत अनेकदा आपली भूमिकाही मांडली आहे.
बच्चू कडू यांनी यापूर्वी भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सरकार असताना शालेय शिक्षण राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांना आणखी एक संधी देण्यात यावी, असा त्यांचा आग्रह होता. याबाबत जाहिरपणे त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे, बच्चू कडू यांना अखेर संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.