'कोव्हिड बॅच'? 'निकाला'त

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालात राज्यातील ७ हजार ६९६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. ३५ ते ४५ टक्के गुण १ लाख ६७ हजार ७६३ विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. गेल्या वर्षी १० हजार ३७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vijay Chavan
  • Fri, 26 May 2023
  • 12:49 am
'कोव्हिड बॅच'? 'निकाला'त

'कोव्हिड बॅच'? 'निकाला'त

गतवर्षीच्या तुलनेत बारावीचे ९० टक्क्यांवरील विद्यार्थी यंदा २,३५१ ने घटले

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@VijayCmirror

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालात राज्यातील ७ हजार ६९६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. ३५ ते ४५ टक्के गुण १ लाख ६७ हजार ७६३ विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. गेल्या वर्षी १० हजार ३७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. त्यामुळे ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी गेल्या वर्षीच्या तुलनेत २ हजार ३५१ ने घटल्याचे समोर आले आहेत. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते. 

यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा पाया कच्चा राहिला आणि त्याचा परिणाम म्हणून यंदा बारावीतील ९० टक्क्यांवरील विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले असावे, असे विश्लेषण तज्ज्ञांनी केले आहे. 

सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते. विद्यार्थी, पालकांना दुपारी दोन वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल. निकालातील महत्त्वाची बाब म्हणजे, एकूण निकाल घटण्याबरोबरच यंदा ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेले गुणवंत घटले आहेत.

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकाला निकालानुसार यंदा बारावीचा ९१. २५ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात २.९७ टक्के घट झाली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.१ टक्के, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी ८८.१३ टक्के लागला. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.५९ टक्क्यांनी अधिक आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. नव्या शैक्षणिक धोरणानुसार दहावी-बारावीच्या परीक्षा होणार नसल्याचा गैरसमज समाजमाध्यमातून पसरला आहे. याबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी स्पष्टीकरण देऊन पुढील वर्षीही दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनेच होणार असल्याचे सांगितले. देशभरात नव्या शैक्षणिक धोरणाची चर्चा आहे.

गोसावी म्हणाले, 'की नव्या शैक्षणिक धोरणात दहावी-बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ त्या परीक्षा सत्र पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत सांगितले आहे. त्याशिवाय पाचवी आणि आठवीच्याही परीक्षा घेण्याबाबत नमूद केलेले आहे. त्यामुळे पुढील वर्षीही प्रचलित पद्धतीनेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे.'

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest