संग्रहित छायाचित्र
पुणे: सोलापूर रस्त्यावरील हडपसरमध्ये रस्त्यावर खासगी ट्रॅव्हल बस थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, मनाई आदेशाला केराची टोपली दाखवत खासगी ट्रॅव्हलचालक भर रस्त्यात बस थांबवून प्रवासी भरण्याचे काम सुरूच ठेवत आहेत. यामुळे हडपसर भागात रात्रीच्या वाहतूक कोंडीतून अद्याप नागरिकांची सुटका झालेली नाही.
हडपसर भागातील भाजी मंडई, गाडीतळ, आकाशवाणी, मगर पट्टा या भागात खासगी ट्रॅव्हल बस उभ्या राहात असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शेवाळेवाडी येथील पीएमपी बसची जागा खासगी ट्रॅव्हल बस थांब्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर काही दिवस हडपसर परिसरात वाहतूक कोंडी कमी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर आता खासगी ट्रॅव्हल बसचालकांकडून पुन्हा एकदा रस्त्यातच बस थांबवून प्रवासी भरण्याचे काम सुरू आहे.
प्रामुख्याने आकाशवाणी चौकात खासगी ट्रॅव्हल बस थांबत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. चौकात वाहतूक कोंडी होत असल्याने उड्डाण पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात.
सोलापूर महामार्गावरून हडपसर भागात जड वाहनांची मोठी वाहतूक सुरू असते. त्यात खासगी ट्रॅव्हल बस मगरपट्टा ते आकाशवाणीपर्यंत प्रवाशांना सेवा देण्यासाठी भर रस्त्यात उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यावर पुणे वाहतूक पोलिसांनी पर्याय शोधून खासगी ट्रॅव्हल बसना शेवाळेवाडी येथील पीएमपी प्रशासनाची जागा भाडे तत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर आता खासगी ट्रॅव्हल बस रस्त्यात उभ्या न करता थेट शेवाळेवाडी येथे थांबविण्यात याव्यात, अशा सूचना दिल्या जात होत्या. त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. मात्र काही खासगी बसचालकांना याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. या बसचालकांना नियमांची आठवण करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सोलापूर रस्त्यावरील हडपसर भागात मोठी बाजार पेठ आहे. या बाजार पेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. सोलापूर हायवेलगत मोठ्या प्रमाणावर कपड्यांची दुकाने आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणारे नागरिक खरेदीसाठी येतात. ते आपली वाहने रस्त्यावर लावतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यात रस्त्यावरून सोलापूरसह इतर जिल्ह्यात जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल बसची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे प्रवासीही मोठ्या प्रमाणावर असतात. प्रवाशांसाठी बस रस्त्यावरच थांबत असल्याने वाहतूक कोंडी होते. संध्याकाळी सात वाजताच वाहनांच्या रांगा लागतात. आकाशवाणी चौकातही एस टी बस आणि खासगी बस थांबत असल्याने उड्डाण पुलावर वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यावर वाहतूक पोलिसांनी कायमचा मार्ग काढल्यानंतरही बस थांबत असल्याने पुन्हा एकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
वाहतूक पोलिसांनी रात्रीच्या वेळी थांबून खासगी बसचालकांवर कारवाई करावी, त्याशिवाय बसचालकांवर दबाव निर्माण होणार नाही. नियमांची कडक अंमलबजावणी केली तरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
- राजेश पवार, नागरिक.
आकाशवाणी चौकात एस टी बस थांबतात, त्यामुळे प्रवाशांची मोठी संख्या येथे असते. एसटी बसचा थांबाही शेवाळीवाडी येथे केला तर चौकात होणारी वाहतूक कोंडी कायमची बंद होईल. यावर प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे. वाहतूक पोलीस असतील तरच वाहतूक कोंडीवर मार्ग निघेल.
- प्रशांत क्षीरसागर, नागरिक