संग्रहित छायाचित्र
पुणे: भवानी पेठेतील निवडुंगा मंदिर येथे राज्य महिला आयोगामार्फत आयोजित आरोग्यवारीमध्ये वारकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्य महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, पुणे मनपा अधिकारी यांच्यासोबत स्वच्छ संस्थेचे भवानी पेठ, कसबा व बिबवेवाडी या वॉर्डस मधील कचरा वेचक उत्साहाने सहभागी झाले.
समाजातील बंधुभावाचा संदेश देत कचरा वेचकांनी ‘पाडू चला रे भिंत’ हे गाणे म्हणले. ‘स्वच्छतेचे वारकरी प्रत्येक दिवशी प्रत्येक दारी’ असे फलक धरून स्वच्छतेची वारी सर्व समावेशक होण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करा, माणसांचे नाही असा संदेश कचरा वेचकांनी दिला. नागरिकांना कचरा वेचकांना कचरा वर्गीकृत करून देण्याविषयी आणि महिन्याचे सेवा शुल्क नियमितपणे देण्याविषयी कचरावेचकांनी जनजागृती केली. ओला सुका कचरा वर्गीकरण करून कचरा वेचकांचा आत्मसन्मान जपण्याचे सर्वांना आवाहन केले. तसेच ‘कचरा टाकताना तो कोणीतरी हाताने उचलणार आहे याचे भान ठेवा. उघड्यावर कचरा टाकू नका. कचरा जाळू नका.’ असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्यवारी मध्ये सहभागी झालेल्या दररोज दारोदारी स्वच्छतेची वारी काढणाऱ्या स्वच्छच्या कचरावेचकांचे अभिनंदन केले.
पंढरपूर वारी ही महाराष्ट्रातील लाखों वारकऱ्यांच्या मनातील महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे आणि आध्यात्मिक परंपरेचा भक्कम पाया आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील स्वच्छ कचरा वेचक हे देखील दररोज दारोदारी जाऊन कचरा संकलनाची आरोग्य वारी करणारे स्वच्छतेचे वारकरी आहेत. शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाचा भक्कम पाया आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी नागरिकांनी देखील ओला, सुका व सॅनिटरी कचरा वेगळा करून आरोग्यवारीत सामील व्हावे. "काय काशी करिती गंगा, भीतरी चांगा नाही तो" - या संत तुकारामांच्या ओळींचे महत्त्व आरोग्यवारीच्या निमित्ताने अधोरेखित झाले.