संग्रहित छायाचित्र
कसबा विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण समाजातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी अशी मागणी सकल ब्राह्मण समाजाकडून करण्यात आली आहे. सकल ब्राह्मण समाजाचे समन्वयक भालचंद्र कुलकर्णी यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूकांची आचारसंहिता सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील धर्म-जात-पंथ अशा सर्वच आघाड्यांवर यंदाची निवडणूक अधिकच गाजणार असे दिसू लागले आहे. जातीनिहाय आरक्षणांमुळे जाती- पातींची अस्मिता अधिकच गडद होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत हिंदुत्वाचा आवाज काहीसा क्षीण होऊ लागला आहे. हिंदुत्वाची पताका आपल्या खांद्यावर घेवून अधिक सकारात्मक काम करणारा राष्ट्रसमर्पित असलेला ब्राह्मण समाज असल्याचं सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने म्हटले आहे.
सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या या प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे की, ब्राह्मण समाजाने कायमच हिंदुत्वाला साथ दिली आहे. महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण पाहता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांनी कायमच हिंदुत्वाची कास धरली आहे. हे करतांना या दोन्ही पक्षांनी सर्वसमावेशक धोरण अवलंबतांना ब्राह्मण समाजाला देखील प्राधान्य दिले आहे. नुकतेच ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ देखील विद्यमान सरकारने मंजूर केले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील ब्राह्मणबहुल असलेल्या किमान ३० विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी विविध ब्राह्मण संस्था, संघटना भाजप आणि शिवसेनेकडे यापूर्वीच केलेली आहे.
यासंदर्भात पुणे शहरात प्रामुख्याने कसबा विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण समाजाची मोठी मतदार संख्या आहे. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण समाजातील सुयोग्य व्यक्तीला उमेदवारी द्यावी. यापूर्वी या मतदारसंघात दिवंगत मुक्ता टिळक, दिवंगत गिरीश बापट, दिवंगत अण्णा जोशी, दिवंगत डॉ. अरविंद लेले अशांनी विधानसभेत प्रतिनिधीत्व केले आहे, याची भाजपने विशेषत्वाने दखल घ्यावी. ब्राह्मण समाजाने कायमच भाजपला साथ दिलेली आहे, यादृष्टीने या मागणीचा जरुर विचार व्हावा असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.