संग्रहित छायाचित्र
गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील उपनगरात विजेच्या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त करत असून, या विरोधात कुठे आंदोलन तर, कुठे निवेदन देऊन तक्रारी करण्यात येत आहेत. चिखली, मोई, मोशी, निगडी, आकुर्डी आणि भोसरी भागात महावितरणच्या समस्या भेडसावत आहेत. शहरातील अनेक ठिकाणी नागरिक थेट महावितरण अधिकाऱ्यांना भेटून तक्रारींचा पाढा त्यांच्यासमोर वाचत आहेत.
मोशी व चिखली परिसरात वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे याबाबत कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. तसेच, अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. महावितरणच्या अधिकारी खडबडून जागे झाले. चिखली आणि मोई या दोन्ही गावांना एकाच वीज वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. विजेचा ताण वाढल्याने तसेच मोई परिसरातील खाणीत शेकडो क्रशर आहेत. त्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून करण्यात आल्या आहेत. एकदा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागत आहे. रात्री-अपरात्री कधीही वीजपुरवठा खंडित होत असल्याने आणि सध्या उष्णता वाढल्याने नागरिक उकाड्याने हैराण होत आहेत.
चिखली परिसरातदेखील अनेक लहान-मोठे लघुउद्योग आहेत. खंडित वीज पुरवठ्यामुळे लघुउद्योगांचे कामकाज बंद पडत आहे. या सर्व परिस्थितीवर ग्रामस्थांनी तसेच परिसरातील युवा नेत्यांनी महावितरणच्या विरोधात आंदोलन अन् मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्याचप्रमाणे वाकड, थेरगाव परिसरातदेखील वारंवार वीज समस्या भेडसावते. सकाळी महापालिकेकडून पाणी येण्याच्या वेळेस नेमकी वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. जुन्या व जीर्ण झालेल्या केबल्स आणि वाढता ताण यामुळे ही समस्या होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागरिकांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खराब
आकुर्डी परिसरात योग्य क्षमतेने वीजपुरवठा होत नसल्यामुळे विजेचा होल्टेज कमी-जास्त होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे टीव्ही, फ्रिज यांसारखे अनेक उपकरणे खराब होत आहे. त्याचप्रमाणे दत्तवाडी, विठ्ठलवाडी, एकतानगर, क्रांतीनगर टेल्को कपूर, कॉलनी आकुर्डी गावठाण या सर्व परिसरामध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. परिसरातील कोणत्या भागात रस्त्याचे काम सुरू असेल किंवा आणखी काही खोदकाम चालू असेल त्या ठिकाणी खोदकाम करत असताना एखादी अंडरग्राउंड वायर डॅमेज झाली किंवा तुटली तर अधिकाऱ्यांकडून लवकर दखल घेतली जात नाही. नागरिक वीज बिलाचा भरणा नियमित करतात. त्याचप्रमाणे महावितरण विद्युत विभागाने नागरिकांना वीजपुरवठा ही नियमित पुरवावा. आमच्या तक्रारीची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीचे पत्र विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने निखिल दळवी यांनी कार्यकारी अभियंता भोसरी विभागाला दिले आहे.