संग्रहित छायाचित्र
उद्योगनगरीत राज्याच्या विविध काना-कोपऱ्यातून आलेले नागरिक गणेशोत्सव काळामध्ये आपापल्या गावी जात असतात. पिंपरी-चिंचवड शहरातून कोकण आणि मुंबई या ठिकाणी जाणारा प्रवासी वर्ग लाखोंच्या संख्येत आहे. मात्र, एसटीचा संप आणि आरक्षण फुल असल्याने खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी आपली पोळी भाजून घेतली आहे. एरवी आकारण्यात आलेल्या दरात अवाच्या सव्वा वाढ करून एक प्रकारची लूट सुरू आहे. तूर्तास, यावरती ना वाहतूक शाखा ना आरटीओ विभाग कारवाई करतो. परिणामी, ऐन सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांचे हाल होत आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मात्र, याचा फायदा खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी घेतला. दरम्यान, एसटी तिकिटापेक्षा दीडपट जादा तिकीट वाढ करता येऊ शकते. मात्र, त्या पेक्षा अधिक दर घेता येत नाहीत. दरम्यान, यावर नियंत्रण ठेवणारी सक्षम यंत्रणा कार्यान्वित नाही. आरटीओकडून केवळ जुजबी कारवाई होत असून, पोलिसांचा वाहतूक विभाग देखील यावर नियंत्रण राखण्यास अपयशी ठरत आहे. वाहतूक कोंडी आणि इतर वाहनांना अडथळे ठरत असल्याने त्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. वाहतूक शाखेकडून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विविध सात ठिकाणी ट्रॅव्हल्सचा थांबा घोषित केला आहे. मात्र, त्या व्यतिरिक्तही विविध ठिकाणी ट्रॅव्हल्स थांबवण्यात येतात. यावरती कारवाईसाठी आरटीओकडून विशेष पथक नेमण्यात येणार होते. वायुवेग पथकाकडून याबाबत कार्यवाही होणे अपेक्षित होते. मात्र, गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असूनही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
आरटीओच्या वायुवेग पथकाकडून नियम मोडणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई सुरू आहे. आरटीओ अधिकाऱ्यांना याबाबत योग्य ते निर्देश देण्यात आलेले आहेत.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी