पिंपरी-चिंचवड: बीआरटी मार्गातील खड्ड्यांची अखेर दुरुस्ती, पालिका प्रशासनाने घेतली 'सीविक मिरर'च्या वृत्ताची दखल
पिंपरी-चिंचवड: शहरातील अंतर्गत भागातील रस्त्याप्रमाणेच बीआरटी मार्गावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. परिणामी, प्रवासीवर्गाला याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच, पीएमपी प्रशासनानेही महापालिकेकडे याची तक्रार केली होती. यानंतर बीआरटी मार्गातील खड्डे बुजवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
'भाविकांचा प्रवास खड्ड्यांतून' या मथळ्याखाली 'सीविक मिरर'ने याबाबत लक्ष वेधले होते. त्याचप्रमाणे बीआरटी मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. या वृत्तानंतर प्रशासनाला जाग आली असून खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील बीआरटी मार्गातील खड्डे बुजवण्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. जुन्या मुंबई-पुणे महा मार्गावर हे काम सुरू करण्यात आले आहे. संबंधित ठेकेदाराला महापालिकेने या पूर्वीच सूचना दिल्या होत्या. मात्र त्या कामात सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने पीएमपीएमएलला खड्ड्यातून मार्ग काढावा लागत होता.
दापोडी ते निगडी बीआरटी मार्गावर पीएमपी बसची सतत वर्दळ असते. त्याचप्रमाणे किवळे ते औंध आणि काळेवाडी देहू आळंदी या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर प्रवासी करतात. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, कामगारांची संख्या मोठी आहे. मात्र, या मार्गावरील खड्ड्यांमुळे बसचालकांचीही तारांबळ उडत होती. वेगवान प्रवासासाठी उभारलेला हा बीआरटी मार्ग खड्ड्यांमुळे अडथळ्याचा ठरत होता. त्या बाबत प्रवाशांनी तक्रारी करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत होते. पुण्यावरून मुंबईकडे जाताना पिंपरी चौकातील बीआरटी मार्गात खड्डे बुजवण्यात आले. तसेच जुना मुंबई पुणे महामार्गावर असणाऱ्या बीआरटीमधील खड्डे बुजवणार असल्याची माहिती महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, विविध कारणांनी रस्त्याबरोबरच बीआरटी मार्गात देखील खोदाई करण्यात आली होती. मात्र, व्यवस्थित खड्डे न बुजवल्याने ही परिस्थिती निर्माण झाली होती.
बीआरटी मार्गात अनेक अडथळे
बीआरटी मार्गामध्ये विविध ठिकाणी खड्डे पडले असल्याचे पीएमपी प्रशासनानेही महापालिकेला निदर्श आणून दिले. दरम्यान, खड्ड्यांबरोबरच ठिकठिकाणी टाकत असलेला कचरा, बेशिस्त वाहनाची घुसखोरी, काही ठिकाणी पडलेला राडारोडा आणि अनधिकृत रिक्षा पार्किंग असे अनेक समस्या पीएमपी बसचालकांना भेडसावत आहेत. त्यानुसार हे देखील अडथळे दूर करावेत, अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आलेली आहे.