File Photo
पिंपरी-चिंचवड शहरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसची योग्यता तपासणी करून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. आरटीओने याबाबत कारवाईचा इशारा देऊनही सध्या जवळपास १ हजार अयोग्य स्कूलबस धावत आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी या बसवर कारवाईचा इशारा दिला असला तरी बसचालकांनी याची दखलच घेतलेली नाही. त्यांना वळणावर आणण्यासाठी आरटीओ आणि पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने संयुक्त कारवाई करण्याची गरज आहे.
शहरामध्ये जवळपास सातशे ते आठशे खासगी शाळा आहेत. यामध्ये भरमसाठ फी भरून पालक आपल्या पाल्यांना पाठवतात. काही शाळांच्या स्वतःच्या स्कूलबसमधूनच हे विद्यार्थी प्रवास करीत आहेत. या स्कूलबसकडे योग्यता प्रमाणपत्र, परवाना, विमा आदी महत्त्वाची कागदपत्रे नसून, या धोकादायक बसचा प्रवास मुलांच्या प्राणाशी बेतू शकतो, त्याबाबत स्कूल प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. कारण, आरटीओने वारंवार शाळेला कळवूनही त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही.
वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र देताना वाहन योग्य आहे का, रस्त्यावर धावताना त्याचे पार्ट निकामी नाहीत ना, वाहन सुरक्षिततेची हमी देऊ शकते का, लाईट, हॉर्न, ब्रेक योग्य असून त्यातून विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होऊ शकते का, हे सगळे तपासले जाते. औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळख असलेले पिंपरी-चिंचवड शहर आता शैक्षणिक क्षेत्रातदेखील अग्रेसर होत आहे. त्यामुळे स्मार्ट शाळा उभ्या राहात आहेत.
या शाळांमधून मिळणाऱ्या उच्च दर्जाच्या शिक्षणातून मुलांचे भविष्य घडणार असल्याने पालक काबाडकष्ट घेऊन त्यांना शाळेत पाठवतात. मुलांना वेळेत शाळांमध्ये पाठविण्यासाठी स्कूलबसची सोय करण्यात आली आहे. शहरातील एकूण तीन हजार स्कूलबसपैकी हजाराहून अधिक स्कूलबस रस्त्यावर धावण्यास अयोग्य असल्याची माहिती आहे. या बसमालकांवर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने ठोस कारवाई करावी अशी मागणी पालक करत आहेत.
आरटीओचे नियम धाब्यावर
आरटीओचे नियम बसचालक पाळत नसल्याचे दिसून येते. प्रत्येक शालेय स्कूलबस आणि व्हॅनचा रंग पिवळा असणे आवश्यक आहे. मात्र, अजूनही वेगवेगळ्या खासगी आणि मालवाहतूक वाहनातूनही विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. एवढेच नव्हे तर, एका स्कूलबसमध्ये ठराविक विद्यार्थी संख्या बसवण्याचा नियम असताना तो नियमही पाळला जात नाही. नियमापेक्षा अधिक विद्यार्थी बसवले जातात.
वाहनांची तपासणी
आरटीओने जानेवारी ते ऑगस्टपर्यंत साडेसहाशे वाहनांची तपासणी केली. त्यात २४० वाहनांकडून दंड वसूल केला. या माध्यमातून आरटीओला ६३ लाख रुपये मिळाले आहेत .