रस्ता सिमेंटचा, पाणी पिण्याचे
महेंद्र कोल्हे
बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरण्यास पुणे महानगरपालिकेने बंदी घातलेली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी बांधकामासाठी वापरण्यात यावे असा निर्णय महापालिकेने गेतला आहे. प्रशासनाच्या निर्णयाचा पालिकेला विसर पडल्याचे दिसत आहे. बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद मुख्य रस्त्याच्या बांधकामाबाबत हा निर्णय केराच्या टोपलीत टाकल्याचे दिसून आले. येथील रस्ता सिमेंटचा केला जात असल्याने मजबुतीकरणासाठी त्यावर काही दिवस पाणी मारण आवश्यक असते. त्यासाठी चक्क पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. शहरातील बांधकामे मोठ्या प्रामणात वाढली असली तरी त्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याची मागणीत मात्र वाढ झालेली नाही. बांधकामांसाठी पिण्याचे पाणी चोरून वापरले जात असल्याची शक्यता आहे. याचा शोध घेऊन ते तातडीने थांबवण्याची गरज आहे.
बिबवेवाडी येथील मुख्य रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळले होते.अखेरीस त्याला मुहूर्त लागला. मात्र, हे काम कूर्म गतीने सुरु असून दीड वर्षांपासून ते सुरुच आहे. त्यामुळे येथील रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकाने, इमारतीतील नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. रस्त्याचे काम सिमेंटचे होत असल्याने त्याच्या मजबुतीसाठी काही दिवस पाणी शिंपडणे आवश्यक असते. मात्र त्यासाठी चक्क पिण्याचे पाणी वापरत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सीविक मिररशी बोलताना सांगितले आहे.
शहरात पाणी टंचाईची गंभीर समस्या भेडसावत असल्याने पालिकेने बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरू नये असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा महापालिकेला विसर पडल्याचे दिसते. खडकवासला धरण साखळीतली पाणी साठा कमी झाल्याने पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाण्याचा वापर जपून करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणी पुरवठा विभाग बांधकाम व्यावसायिकांना सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध करून देत असल्याचे सांगत आहे.
हे पाणी टँकरद्व्यारे उपलब्ध करून देण्यात येते. तसेच पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. यावर्षी मॉन्सूनचा प्रवास लांबल्याने आणि खडकवासला धरण साखळीतील पाणी साठा कमी झाल्याने शहरात पाणी कपात करण्यात येत आहे. खडकवासला धरण प्रकल्पातील पाणी साठा झपाट्याने कमी होत असून उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्याताच पाऊस वेळवर पडला नाही तर तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी महापालिकेने उपाय योजना कराव्यात अशा सूचना दिलेल्या आहेत.
बांधकाम आणि वॉशिंग सेंटरसाठी पिण्याचे पाणी वापरले जात असल्याबाबतच्या तक्रारी आल्याने एरंडवणे, डीपी रस्ता अशा अनेक महापालिकेने ठिकाणी कारवाई केली आहे. तसचे महापालिकेचे शहरात विविध ठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण केंद्र आहेत. तेथे शुद्ध केलेले पाणी बांधकामाला वापरावे, पिण्याचे पाणी वापरू नये असे आदेश महापालिकेने काढले होते. बांधकामांसाठी पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून टँकरद्वारे पाणी देण्यात येते. सर्व बांधकामांना हेच पाणी वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. या पाण्याच्या मागणीसाठी महापालिकेकडून स्वतंत्र मोबाइल ऍपही विकसित करण्यात आले आहे.