रोहित शर्मा एक जबरदस्त कर्णधार आहे : सौरव गांगुली
रोहित शर्मा एक जबरदस्त कर्णधार असून त्याच्यात नेतृत्वाची क्षमता असल्याचे मत सौरवने व्यक्त केले आहे. भारतीय संघाने वनडे वर्ल्डकपमध्ये आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली आहे.
एका मुलाखतीवेळी सौरव गांगुलीने रोहित शर्माला कर्णधार करण्यामागचे कारण सांगितले. गांगुली बीसीसीआय अध्यक्ष असताना रोहित शर्माला भारतीय संघाचा कर्णधार करण्यात आले होते. रोहितकडे डिसेंबर २०२१ मध्ये वनडे आणि टी २० संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्यानंतर महिनाभरातच कसोटी संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आले.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०२० च्या टी २० वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमध्ये पोहोचला होता. याचबरोबर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला होता. गेल्या वर्षी भारतीय संघ आयसीसी वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला. या तीनही स्पर्धेवेळी भारताचे विजेतेपद थोडक्यात हुकले.
सौरव गांगुली रोहितबाबत म्हणाला, 'रोहित शर्मा एक जबरदस्त कर्णधार आहे. त्याने वर्ल्डकपमध्ये कशा प्रकारे नेतृत्व केलं हे आपण पाहिलं आहे. मला वाटतं की भारतीय संघ फायनल हरण्यापूर्वी स्पर्धेतील सर्वोत्तम संघ होता. रोहित एक चांगला कर्णधार आहे. त्याच्या नावावर अनेक आयपीएल टायटल आहेत. त्याने ज्या प्रकारे नेतृत्व केले त्याचं मला आश्चर्य वाटत नाही. मी अध्यक्ष होतो, त्यावेळी तो कर्णधार झाला होता. आम्ही त्याला कर्णधार केले, कारण त्याच्यात ती क्षमता होती. त्याने जे काही कौशल्य दाखवले ते पाहून मला तरी आश्चर्य वाटलं नाही.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. ही मालिका भारताने प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत देखील ३-१ अशी जिंकली आहे. आता मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना हा धरमशाला येथे खेळला जाणार आहे. इंग्लंड भारतात येण्यापूर्वी बॅझबॉलची मोठी चर्चा होती. मात्र रोहितच्या नेतृत्वाखालील संघासमोर बॅझबॉलने शरणागती पत्करली आहे.