बीसीसीआय आयपीएलनंतर करणार कसोटीपटूंच्या मानधनात वाढ
आयपीएल संपल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाऊन त्याची अंमलबजावणी होणार आहे.
सध्या खेळाडूंना कसोटी खेळण्यासाठी १५ लाख रुपये मिळतात. आयपीएलनंतर यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. सध्या एका कसोटी सामन्यासाठी भारतीय खेळाडूंना १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख आणि टी-२० सामन्यासाठी ३ लाख रुपये मिळतात. आयपीएल संपल्यानंतर कसोटीपटूंना नक्की किती रुपये वाढून मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बीसीसीआयने खेळाडूंची फी वाढवण्यासाठी मसुदा तयार केला आहे. पुढील बैठकीत या योजनेला मंजुरी मिळेल. त्यानंतर बीसीसीआयने करारबद्ध केलेल्या खेळाडूंना नव्या रचनेनुसार वेतन मिळेल. रेड बॉल क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने फी वाढवण्याचे संकेत यापूर्वीत दिले होते. त्यानुसार योजना तयार करण्यात आली असून आयपीएलनंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.
अलीकडेच, बीसीसीआयने केंद्रीय करारामध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंबाबत इशारा दिला होता. जे खेळाडू तंदुरुस्त आहेत आणि राष्ट्रीय संघाचा भाग नाहीत त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल, असे बोर्डाने म्हटले होते. असे असूनही, इशान किशन, कृणाल पांड्या आणि दीपक चहर या खेळाडूंनी त्यांच्या राज्यासाठी रणजी सामने खेळले नाहीत.
इशान, कृणाल आणि चहर यांनी फेब्रुवारीमध्येच आयपीएलची तयारी सुरू केली होती. इशान मुंबई इंडियन्सकडून खेळतो, पांड्या लखनऊ सुपरजायंट्सकडून आणि चहर चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळतो.
...तर कसोटीपटूंना बोनसही मिळेल!
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, ‘‘आयपीएलनंतर नवीन वेतन रचना लागू केली जाऊ शकते. यामध्ये खेळाडूने वर्षभरात संघासोबत सर्व कसोटी मालिका खेळल्यास त्याला बोनसही मिळेल. वार्षिक पगार आणि मॅच फी व्यतिरिक्त त्याला चांगली रक्कम दिली जाईल. खेळाडूंनी लाल चेंडूचे क्रिकेट खेळण्यात अधिक रस दाखवावा यासाठी हे केले जात आहे. त्यामुळे खेळाडूंना कसोटी खेळताना अधिक फायदा होणार आहे.’’