आम्हाला सातत्याने गाफील ठेवण्यात आले : अजित पवार
कर्जत : शपथविधी घेण्याअगोदर आम्ही साहेबांची भेट घेतली त्यांना कल्पना दिली मात्र आम्हाला सातत्याने गाफील ठेवण्यात आले असा थेट आरोप करतानाच जो घटनाक्रम घडला तो राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जत येथील वैचारिक मंथन शिबीरात सांगितला. दरम्यान प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील यांना हे सर्व माहित आहे असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
आम्ही दहा - बारा जण देवगिरीला होतो. सुप्रिया सुळे हिला बोलावले आणि आमचा झालेला निर्णय सांगितला. लोकशाहीत बहुमताचा आदर राखला जातो. सात - आठ दिवसात साहेबांशी बोलून सांगतो म्हणाली. आम्ही थांबलोही मात्र तो वेळ गेल्यावर पुन्हा साहेबांना सांगितले. ठिक आहे म्हणाले. वेळ जातोय निर्णय घ्या सांगत होतो. १ मे रोजी मला बोलावून सरकारमध्ये जावा असे सांगितले. मात्र १ मे रोजी सगळे बाहेर असतात म्हणून मग २ मे ला कार्यक्रम ठरला साहेबांनी राजीनामा दिला. मात्र त्यावेळी वातावरण वेगळे निर्माण झाले. तर दुसरीकडे काही लोकांना बोलावून राजीनामा परत घेण्यासाठी आंदोलन करायला सांगण्यात आले. त्यावेळी काही ठराविक टाळकी तिथे होती. मला एक आणि इतरांना वेगळे सांगत होते. ही गोष्ट परिवारातील म्हणून तुम्हाला सांगितले. हे सर्व गाफील ठेवून केले गेले असेही अजित पवार म्हणाले.
२ जुलैला आम्ही घेतलेला निर्णय आवडला नाही तर मग १७ जुलैला आम्हाला का बोलावले? सगळे आमदार घेऊन गेलो. चहापान झाला सगळं सुरळीत होणार आहे असे सांगत होते. त्यावेळीही गाफील ठेवले गेले. १२ ऑगस्टला उद्योगपतींच्या घरी बैठकीसाठी बोलावले. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून काम करत होतो ना. पक्षासाठी काम करत होतो ना? असा सवाल उपस्थित करतानाच काहीजण आता गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत आहेत. संघर्ष यात्रा काढत आहे आयुष्यात कधी केला नाही आता कशाला संघर्ष करता असा टोलाही नाव न घेता रोहित पवार यांना लगावला.