File Photo
नवी दिल्ली : हरियाणाच्या निकालामुळे देशाचा मूड कळला आहे. जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडण्याचा काँग्रेसचा मनसुबा हरियाणाच्या जनतेनं उधळून लावला आहे. महाराष्ट्रातील मतदारही हेच करतील, असा विश्वास व्यक्त करतानाच, ‘महाराष्ट्रात महायुतीला मोठा विजय हवा,’ अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केली. मुंबई, अंबरनाथ, नाशिक, जालना, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा, वाशीम, भंडारा आणि हिंगोली येथील विविध सुविधांसह राज्यातील १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
मोदी म्हणाले, हरियाणाच्या निकालामुळे देशाचा मूड कळला आहे. दोनवेळा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सलग तिसऱ्या वेळी जिंकून येणं ऐतिहासिक आहे. काँग्रेसची पूर्ण इकोसिस्टम, शहरी नक्षलवादी गँग लोकांना संभ्रमात टाकत आहे. काँग्रेसचे सर्व षडयंत्र उद्ध्वस्त झाले. दलितांमध्ये खोटं पसरवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. दलित समाजाने त्यांच्या वाईट विचारांना दूर लोटलं.
त्यांना जाणीव झाली की काँग्रेस त्यांचे आरक्षण काढून त्यांच्या मतपेढीला देऊ इच्छित आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकावलं, पण शेतकऱ्यांना माहिती आहे की त्यांच्या उत्पादनावर एमएसपी कोणी दिली? काँग्रेसने तरुणांना टार्गेट केलं आणि वेगवेगळ्या पद्धतीने भडकावण्याचा प्रयत्न केला. तरुणांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपावरच विश्वास ठेवला. काँग्रेसने सर्व प्रयत्न केले.
काँग्रेस नेहमीच फूट पाडा आणि सत्ता मिळवा यावर चालते. काँग्रसेने सातत्याने सिद्ध केले आहे तो काँग्रेस बेजबाबदार पक्ष आहे. समाजात फूट पाडण्याकरता ते फॉर्म्युला आणत असतात. काँग्रेसचा फॉर्म्युला स्वच्छ आहे की मुस्लिमांना भीती घाला, त्यांचे मतपेढीत रुपांतर करा. काँग्रेसला माहीत आहे की हिंदूत जितकी फूट पडेल तेवढाच त्यांचा फायदा असेल. हिंदू समाजात आग लावण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जातो.
काँग्रेस ही द्वेष पसरवणारी मोठी फॅक्टरी बनणार, असे स्वातंत्र्यानंतरच अनेक नेत्यांना कळले होतं. त्यामुळे काँग्रेसला संपवलं पाहिजे असं खुद्द महात्मा गांधी म्हणाले होते. काँग्रेस स्वतःहून संपली नाही. ते देशाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसच्या प्रयत्नांना महाराष्ट्रातील लोकांनी हरवलं पाहिजे. महाराष्ट्रातील लोकांनी भाजपा, महायुतीसाठी मतदान करायचं आहे. गेल्या दहा वर्षांत आम्ही देशात विकास घडवण्याचा मोठा यज्ञ केला आहे. वृत्तसंंस्था