संग्रहित छायाचित्र
रोज माझा राजीनामा मागणे काहीजणांचा छंद आहे. सकाळी उठून कॅमेरासमोर येऊन माझा राजीनामा मागितल्याशिवाय त्यांना अन्नच पचत नसल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. येथे पोलीस पाटील संघटनेशी संवाद साधताना ते बोलत होते.
ते म्हणाले, खरं म्हणजे गृहमंत्री म्हणून काम करताना शिव्याच जास्त खाव्या लागतात. मी राज्याचा गृहमंत्री आहे. मात्र, पोलीस पाटील हे त्यांच्या गावाचे गृहमंत्रीच आहात हे विसरू नका. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात तुमचा मोठा वाटा आहे. तुम्ही सगळ्यांनी माझा सत्कार केला याचं समाधान आहे.
पोलीस पाटील संघटनेचे मला लोक भेटायचे तेव्हा मला ते सांगायचे आम्हाला, बिनपगारी फुल अधिकारी, असे म्हणून हिणवलं जातं. मी त्यांना म्हटलं काळजी करू नका. तुम्हाला फुल पगारी आणि फुल अधिकारी असाच दर्जा आम्ही देणार आहोत. या मानाच्या पदाला आम्ही १५ हजार रुपये मानधन केलं. दोन-तीन दिवसांपूर्वी सांगितलं असतं मी पैसे खात्यात जमा करूनच आलो असतो. सोमवारी जी. आर. निघून चार महिन्यांचे पैसे खात्यात जातील. सरकारमध्ये काम चालतं गोगलगायीच्या गतीने. त्यामुळे आम्हाला फाईलला धक्का द्यावा लागतो. तसा धक्का मी आज दिला आहे.
रेशीम बाग मैदानात झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या मेळाव्यात फडणवीस म्हणाले, काही लोक ही योजना बंद करू पाहत आहेत. मात्र आम्ही या योजना बंद होऊ देणार नाही. मुलींना मोफत शिक्षण, शुभमंगल योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना, लेक लाडकी योजना, यासारख्या योजना आपल्याला चालू ठेवायच्या आहेत. मला सर्व बहिणींना सांगायचं आहे की राजकारणात वेगवेगळे पक्ष असू शकतात. परंतु, लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार उच्च न्यायालयात गेले आहेत. हे वडपल्लीवार काँग्रेसचे नाना पटोले, विकास ठाकरे, सुनील केदार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.
फडणवीस म्हणाले, विरोधक योजना बंद व्हाव्यात यासाठी न्यायालयात गेले असले तरी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मी आश्वासन देतो की तुमचा हा देवा भाऊ आहे, तोवर उच्च न्यायालयात मोठ्यात मोठा वकील उभा करू. काहीही झालं तरी या योजनांवर स्थगिती येऊ देणार नाही. आम्ही प्रयत्नांची शर्थ करून उच्च न्यायालयात खटला लढू आणि योजना चालू ठेवू.