रणसंग्राम २०२४: काँग्रेस, समाजवादी पक्ष इतिहास घडविणार की...?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधकांची इंडिया आघाडी मैदानात उतरली आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये तब्बल सात वर्षांनंतर काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र आले आहेत.

संग्रहित छायाचित्र

काँग्रेस-समाजवादी पार्टीतील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

लखनौ / नवी दिल्ली 
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधकांची इंडिया आघाडी मैदानात उतरली आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये तब्बल सात वर्षांनंतर काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र आले आहेत. त्यापूर्वी गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी जागावाटपावर टोकाची भूमिका घेतली होती. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी अखेर केलेल्या मध्यस्थीला यश आले. त्यांनी थेट समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी थेट फोनवरून चर्चा केली आणि काँग्रेस-समाजवादी पार्टीतील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.  (Congress Samajwadi Party Allianace)

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस १७, तर सपा ६३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर चार दिवसांनी समाजवादी पक्षप्रमुख अखिलेश यादव रविवारी आग्रा येथील राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झाले होते. दोन्ही नेत्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर निशाणा साधला. २०१७ मध्येही काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने युती केली होती. मात्र, या युतीचा फारसा फायदा दोघांनाही झाला नाही. यंदाच्या निवडणुकीमध्ये २०१७ ची पुनरावृत्ती होईल की नवा इतिहास घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. २०१७ च्या निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं होतं?  हे या निमित्ताने पाहणे महत्त्वाचे ठरते. 

काय झाले होते २०१७ मध्ये?

सात वर्षांनंतर अखिलेश यादव आणि राहुल गांधी काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत पुन्हा एकत्र आले. राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा आणि अखिलेश यादव एकत्र आल्याने २०१७ च्या आठवणींना उजाळा मिळाला. २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी या तिघांनीही विजय रथातून प्रचार केला होता. दोन्ही पक्षांतील नेते यंदाच्या निवडणुकीत २०१७ ची पुनरावृत्ती होणार नाही, अशी आशा व्यक्त करत आहेत. २०१७ च्या निवडणुकीतील परिणामाने दोन्ही पक्षांना धक्का बसला होता. उत्तर प्रदेशमधील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सपाने केवळ ४७ जागा जिंकल्या होत्या. २०१२ मध्ये २२४ जागा जिंकून सत्तेवर आलेल्या सपासाठी हा खूप मोठा धक्का होता. काँग्रेसने या निवडणुकीत केवळ सात जागा जिंकल्या होत्या. २०१२ च्या निवडणुकीत हा आकडा २८ होता. २०१७ आणि २०२४ मध्ये दोन्ही पक्षांतील युतीची चर्चा निवडणुकीच्या काही महिने आधी सुरू झाली. दरम्यानच्या काळात दोन्ही पक्षांच्या संबंधांमध्ये अनेक चढ-उतार आलेत. अखेर पक्षश्रेष्ठींनी यात हस्तक्षेप करून मतभेद दूर केले. २०१७ मध्ये दोन्ही पक्षांचे एकमत होण्यासाठी वेळ लागला होता. त्यावेळी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ११० जागांची मागणी केली होती, तर सपाने १०० जागा देऊ केल्या. त्यावेळी सोनिया गांधी, गुलाम नबी आझाद यांसारख्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी युती स्थापन व्हावी यासाठी पुढाकार घेतला होता. प्रियांका यांनी अखिलेश आणि सपा नेते आझम खान यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर, सपा २९८ जागा लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली, तर काँग्रेसने १०५ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले. घोषणेच्या काही दिवसांनंतर सपाने काँग्रेसला दिलेल्या १० जागांवरही आपले उमेदवार उभे केले.

असे झाले जागावाटप 

यंदा जानेवारीपासून काँग्रेसची राष्ट्रीय समिती आणि सपाची समन्वय समितीमध्ये जागावाटपासाठी बैठक घेण्यात आली. २०१९ च्या निवडणुकीत सपाने जिंकलेल्या रामपूर आणि मुरादाबादसह लोकसभेच्या २८ जागांची मागणी काँग्रेसने केली होती. दरम्यान, सपाने वाराणसी, अमरोहा येथे आपले उमेदवार उभे केले. पूर्वी सपाने या दोन्ही जागा काँग्रेसला देणार असल्याचे आश्वासन दिले होते. २०१७ मध्ये जे घडले तसेच काहीसे पुन्हा घडत होते. अखिलेश यांनी ३१ जागांसाठी आधीच आपले उमेदवार जाहीर केले आहेत. रायबरेलीतील भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासही नकार दिला. या घडामोडींनी चर्चांना उधाण आले. २०१७ प्रमाणे, प्रियांका गांधी वाड्रा यांनी यात हस्तक्षेप केला आणि गेल्या बुधवारी अखिलेश यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी सपाने काँग्रेससाठी अमरोहा आणि वाराणसीसह १७ जागा सोडण्यास सहमती दर्शविली. उर्वरित ६३ लोकसभा जागांवर आपले उमेदवार आणि मित्रपक्षांना सामावून घेणार असल्याचेही अखिलेश यांनी  सांगितले.  २०१७ मध्ये अधिकृत आमंत्रण दिले नसल्याने आणि जागावाटपाची स्पष्टता नसल्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सुलतानपूरमधील अखिलेश यादव यांच्या प्रचार रॅलीत सहभागी होण्यास नकार दिला होता. यंदा अखिलेश यादव यांनीही हेच कारण पुढे करत भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यास नकार दिला. या यात्रेत सपा कार्यकर्त्यांनीदेखील सुरुवातीला सहभागी होणे टाळले होते. २०१७ आणि २०२४ मध्ये मोठा फरक असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले. ‘आम्ही भूतकाळापासून धडा घेत, यावेळी युती केली आहे. आघाडीकडे नेतृत्व करणारे लोक आहेत, यामुळे आमचा विजय निश्चित आहे’, असे काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत म्हणाले. आणखी एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, युतीमध्ये जगावाटपावरून चर्चा होणे साहजिक आहे. काँग्रेसच्या संघटनात्मक त्रुटींमुळे २०१७ मध्ये युती अयशस्वी ठरली. यावेळी लोकांचा कल आमच्या बाजूने आहे, असे पक्षाचे पदाधिकारी म्हणतात. २०१७ च्या तुलनेत दोन्ही पक्षप्रमुखांना चांगला अनुभव आहे, असे पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले. ‘भाजपा हटाओ, देश को बचाओ (भाजपाला हटवा, देशाला वाचवा),’ असे अखिलेश यादव यांनी भारत जोडो न्याय यात्रेवेळी सांगितले. यावेळी उत्तर प्रदेशमधील सर्व ८० लोकसभा जागांवर सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्याचे आवाहनही त्यांनी केले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणे, हा २१ फेब्रुवारीला झालेल्या जागावाटपाचाच परिणाम आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतील परिणाम काय असतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest