माझे वय झालेले नाही!, आजही भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद
मी काही म्हातारा झालेलो नाही. भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद आहे. तुम्ही काही चिंता करु नका, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी (दि. १७) विरोधकांना दिला. (NCP)
पुण्यातील खेड तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी जबरदस्त राजकीय फटकेबाजी केली आहे. ते म्हणाले, ‘‘शरद पवार म्हणाल माझी एक तक्रार आहे. सगळ्या भाषणांमध्ये मी ८३ वर्षाचा झालो, ८४ वर्षाचा झालो, असे म्हणतात. तुम्ही माझ काय बघितलं अजून? मी अजून म्हातारा झालो नाही. भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद माझ्यात आहे.’’
लय भारी लोकांनासुद्धा सरळ करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. तुम्ही काही चिंता करू नका. तुमचे जे काही दुखणे असेल ते सगळे दुखणे दूर करण्यासाठी जे करायला लागेल, ते सगळे करू आणि नवीन इतिहास घडवू, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच या वक्तव्यातून त्यांनी नेमका कोणावर निशाणा साधला आहे. याचीही चर्चा होत आहे.
सरकारमध्ये शेतकऱ्यांबाबत आस्था नाही. कांद्यासह शेतमालाला भाव नाही. कांद्याची निर्यातबंदी केली. शेतकऱ्यांवर संकट ओढण्याचे काम होत आहे. मात्र आपण एकजुटीने महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहोत असा विश्वासही शरद पवारांनी यावेळी बोलून दाखवला.
यावेळी शरद पवार यांनी शरद पवार यांनी बैलगाडा शर्यतीचे कौतुक केले. ते म्हणाले आतापर्यंत अनेक शर्यती टीव्हीवर पाहील्या पण घाटात आल्याशिवाय डोळ्याचे पारणे फिटत नाही. त्यांनी अमोल कोल्हे यांचेदेखील आभार मानले.
रोख नेमका कोणाकडे?
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर अजित पवार यांनी ‘‘आता शरद पवार यांनी घरी बसावे, त्यांचे वय झाले आहे, असे वक्तव्य केले होते. तसेच अजित पवार गटातील अनेक नेतेही शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करतात. त्यामुळे शरद पवार यांचा रोख थेट अजित पवार यांच्यावर आहे की नेमका कोणाकडे आहे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत.