संग्रहित छायाचित्र
बारामती: आता निवडणुकीला साहेब उभे नाहीत, मीही उभा नाही. चाळीस वर्षांपूर्वी तुमच्या घरात आलेल्या सुनेला मत द्यायचं की मुलीला मत द्यायचं हे तुम्ही ठरवा. सुनेला मान असतो, तिला लक्ष्मी म्हटले जाते, सून घरात आल्यावर सासू सुनेच्याच हातात चाव्या देते ना, चुकलं तर जरूर सांगा, आईच्या पोटातून कोणीच शिकून येत नाही, मलाही बोलता येत नव्हते. संधी मिळाली की करून दाखवलच ना.... त्यामुळे भावनिक होऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले.
अजित पवार म्हणाले, ही निवडणूक भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, शरद पवार यांना बारामती, माढा दोन्हीकडे लोकांनी निवडून दिले. नंतर त्यांनी राज्यसभेवर जायचा निर्णय घेतला. त्या नंतर पक्ष तुम्ही चालवा असे त्यांनी सांगितले, आम्ही त्याला मान्यता दिली. नंतर काही घटना घडल्या. कुणी काय निर्णय घ्यावा हा ज्यांचा त्यांचा अधिकार आहे. शेवटपर्यंत मला जे काही सांगितलं गेलं, तेच मी केलं, कुठही कमी पडलो नाही, साहेब फॉर्म भरून जायचे, शेवटच्या सभेला यायचे आणि आपण सगळी कामे करायचो. आज परिस्थिती बदलली आहे, केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तुमच्याकडे फक्त राज्याचाच निधी येणार असेल आणि केंद्राचा निधी येणारच नसेल तर विकास कसा होणार? पाण्याचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा असून तो सोडविताना आपल्याला राज्यासोबतच केंद्राचाही निधी लागणार आहे, ही बाब सर्वांनी लक्षात घ्यायला हवी.
विरोधातील खासदार असेल तर निधी मिळत नाही, अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. सरकार पडल्यानंतर कामे ठप्प झाली याचे बारामतीकर साक्षीदार आहेत. सत्ता नसेल तर विकास होत नाही, हे मतदारांनी विचारात घ्यायला हवे.
अनेक मोठे प्रकल्प मार्गी लावताना केंद्राची मदत घ्यावीच लागते, त्यासाठी महायुतीच्या विचाराचा खासदार निवडून जायला हवा असे सांगून अजित पवार म्हणाले, सरकारच्या बाहेर राहिलो असतो तर आंदोलन, उपोषण, मोर्चा इतकच करायला लागले असते. मागे शिवसेनेसोबत जायला सांगितले आपण गेलो, भाजपला बाहेरून पाठिंबा दिला, त्यांच्या कारकिर्दीत ते जे म्हणतील ते केले. बहुमत असतानाही मुख्यमंत्रिपदही आपण त्या काळात कॉंग्रेसला दिले. जे जे सांगितल ते ते ऐकलं, आता भावनिक व्हायचं नाही. वडीलधारी मंडळींच अंतःकरण जड होतेय, पण माझी त्यांना विनंती आहे की तुमच्या काळात पाणी आणता आलं नाही. आम्ही तो प्रयत्न करतोय. मी विकासासाठी मत मागतोय, सत्तेसाठी मत मागत नाही, बारामतीकरांनी मला भरभरून दिलय, मी समाधानी आहे. जिरायत भागाचा कायापालट करायचा आहे म्हणून मत मागतोय.