'कोणीही ढवळाढवळ न केलेली गाणीच सुपरहिट'
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता अवधूत गुप्तेने सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.अवधूत हा सध्या त्याच्या 'खुपते तिथे गुप्ते' या नव्या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो सध्या समोर आले आहेत. त्यातच आता अवधूतने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची एक आठवण सांगितली आहे.
काही महिन्यांपूर्वी अवधूतने राजकारणात येण्याची मोठी घोषणा केली होती. त्या वेळी त्याने कोणत्या पक्षात जाणार? याबद्दल काहीही भाष्य केले नव्हते. मात्र, आता त्याने त्याच्या राजकीय कारकिर्दीसह पक्षांसाठी गायलेल्या गाण्यांबद्दलही भाष्य केले आहे.
“माझ्या कामाच्या निमित्तानं अनेक राजकीय पक्षांशी माझे संबंध आले. माझे ‘ऐका दाजिबा’ हे गाणे सुपरहिट झाल्यानंतर एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला भेटायला बोलावले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जबरदस्त करिष्मा होता. त्यांच्याकडे गेल्यावर हरखून जायला व्हायचे. त्यावेळी मी २२-२३ वर्षांचा होतो.
अनेकदा ते मला गप्पा मारायला बोलावायचे. आमच्यात तेव्हा ऋणानुबंध निर्माण झाले. शिवसेना पक्षासाठी मी अनेक गाणी केली. जवळपास दहा वर्षं मी शिवसेनेची कामे करत होतो, पण त्यानंतर मलाच काहीसे एकांगी वाटायला लागले. याच्या पलीकडची बाजू काय असेल, असा विचार माझ्या मनात डोकावू लागला.
दरम्यान मी सुप्रिया सुळे यांच्या एका एनजीओसाठी काम केले. ‘राष्ट्रवादी लई भारी’ असे गाणे त्यांना आवडले. त्यांनी मला राष्ट्रवादीचे काम दिले, पण जाहिरात क्षेत्रातील नैतिकतेनुसार तुम्ही एकाच वेळी प्रतिस्पर्ध्यांसाठी काम करू नये. त्यानुसार मी उद्धव ठाकरेंना तसे कळवले. त्यांनीही परवानगी दिली. आता मनसेसाठी केलेले गाणेही लोकप्रिय ठरत आहे. मला असे वाटतं की, ज्यात कुणीही ढवळाढवळ करत नाही, अशी गाणी सुपरहिट ठरतात”, असेही अवधूत गुप्तेने म्हटले आहे.