'सर्किट'च्या भूमिकेमुळे होती करिअर संपण्याची भीती
आपल्या लाजवाब अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारा हरहुन्नरी अभिनेता अर्शद वारसी हा त्याच्या ‘असुर २’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. अर्शदने ‘हासिल’, ‘गोलमाल सीरिज’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘जॉली एलएलबी’अशा वेगवेगळ्या चित्रपटांत काम केले आहे. त्याला खरी ओळख ‘मुन्नाभाई एमबीबीएस’च्या 'सर्किट' या पात्रामुळे मिळाली अन् त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही.
ज्या भूमिकेमुळे अर्शदला आज ओळख मिळाली, त्याच भूमिकेबद्दल तो साशंक होता. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ मधील भूमिका ही वाईट होती, असे त्याचे म्हणणे होते, शिवाय यामुळे त्याचे करिअर संपुष्टात येऊ शकेल अशी भीतीही होती. याआधी या भूमिकेसाठी मकरंद देशपांडे यांनाही विचारण्यात आले होते. ही भूमिका केवळ राजकुमार हिरानी यांच्यासाठी केल्याचं अर्शदने नुकतेच एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले.
यूट्यूबर सिद्धार्थ कन्ननशी संवाद साधताना अर्शद म्हणाला, “हा चित्रपट केल्यानंतर माझे आयुष्य बरबाद होणार आहे, हे मला ठाऊक होते. मला वाटले हा चित्रपट माझा शेवटचा चित्रपट ठरेल. या भूमिकेला मकरंद देशपांडेंसारख्या कलाकारानेही नकार दिला होता. कारण, ही एका गुंडाची भूमिका होती. चित्रपट हिट झाला किंवा फ्लॉप झाला, तरी त्यातून मला काहीच मिळणार नव्हते. संजय दत्तलासुद्धा या चित्रपटाच्या बाबतीत तेवढा कॉन्फिडन्स नव्हता.”
पुढे अर्शद म्हणाला, “मला राजकुमार हिरानी आवडतात, एक माणूस म्हणून आणि एक दिग्दर्शक म्हणून. मला कथा आवडली होती, पण या चित्रपटातून मला काही मिळणार नाही हे मला माहीत होते. कारण आजवरच्या चित्रपटात अशा प्रकारचे गुंड कुणीच पाहिले नव्हते.”
या चित्रपटाने केवळ संजय दत्तचे करिअर रुळावर आणले नाही, तर इंडस्ट्रीला अर्शद वारसीसारख्या कलाकाराची वेगळ्या पद्धतीने ओळख करून दिली अन् चित्रपटाने इतिहास रचला. सध्या राजकुमार हिरानी हे शाहरुख खानसह ‘डंकी’ या चित्रपटावर काम करीत आहेत.