संग्रहित छायाचित्र
आनंद इंगळे (Anand Ingle) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक नाटके, मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. पहिल्याच नाटकाने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली होती. अलीकडेच त्यांनी एक मुलाखत दिली, यावेळी त्यांनी टेलिव्हिजन विश्वाबद्दल स्पष्ट मत मांडले.
टेलिव्हिजन हे प्रत्येक गोष्टीचे बलस्थान आहे. महाराष्ट्रात तरी छोट्या पडद्यावर काम करणारे नट हे टेलिव्हिजनमुळे घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. पण, त्याच लोकप्रियतेबरोबर एक तोच-तोचपणा येतो आणि ज्या कोणत्याच घरात होत नाही अशा गोष्टी कराव्या लागतात. अलीकडच्या काळात रात्री दहा वाजता तुम्हाला उद्या सकाळी सात वाजता कॉल टाइम आहे असे सांगितले जाते. हे काय आहे? ही कोणती सिस्टिम आहे बाबा? नट म्हणतात हे काय आहे… मला हे आवडत नाही. दिग्दर्शक म्हणतो, मलाही हे आवडत नाही. पुढे, लेखक सांगतो मलाही हे आवडत नाही पण, चॅनेल सांगत आहे म्हणून करतो. चॅनेलवाल्यांना विचारले तर, ते सांगतात आम्हालाही हे आवडत नाही. पण, लोकांची हीच आवड आहे आणि लोक आम्हाला येऊन म्हणतात हे काय घाणेरडे करता तुम्ही, बरोबर ना? अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना हे आवडत नाही मग हे कोणाच्या आवडीसाठी चालले आहे? ही काय पद्धत आहे? पूर्वी टेलिव्हिजनवर ‘पिंपळपान’, ‘प्रपंच’, ‘झोका’, ‘आभाळमाया’ अशा मालिका होत्या. सुंदर, छान ज्यात खरी माणसे दाखवली जायची. हे सगळे कुठे गेले ? असा सवाल आनंद इंगळे यांनी उपस्थित केला आहे.
मला असे वाटते की टेलिव्हिजनला आता कॅमेराच अभिनय करतो. अर्धा वेळ तर वेगवेगळे शॉट दाखवले जातात. आता ती स्टाइल मागे पडली पण, आता ती एक शिस्त होती ती नाही राहिली. बिचारे नट-नट्या, जे आजकालचे तरूण हिरो–हिरोइन आहेत ते लोक २५–२५ दिवस सकाळी नऊ ते रात्री दहा–अकरा असे काम करतात. कधी कधी नाइट करतात, पुन्हा सकाळच्या शिफ्टला येतात. या सगळ्या गोष्टी कोणापासून लपलेल्या नाहीत. कुणीही मला सांगावे, असे होत नाही. या अशाच गोष्टी चालू आहेत. मग हे कशासाठी चालू आहे? आणि तरीही लोक म्हणतात एपिसोड का नाहीत? दुसरा एक भयंकर बदल मला टेलिव्हिजनवर जाणवतो तो म्हणजे, अनेक गोष्टी यामुळे रुढ केल्या गेल्या. कोणत्या तरी घरात रोज एक सासू रोज सुनेला लाटण्याने मारते आहे, मला वाईट वाटते की, प्रेक्षक हे सगळे आवडीने पाहतात मग, माझी अभिरुची कुठे चालली आहे ? आज ८० टक्के लोक हेच म्हणतात काय तुमच्या मालिका? मान्य आहे प्रेक्षकांना अतिरंजित पाहायला आवडते पण, आपल्याकडे दुसरे विषयच नाहीत का? ‘फौजी’सारखी मालिका आज झाली पाहिजे, असे मत आनंद इंगळे यांनी मांडले आहे.