‘खिलाडी’चा फाॅर्म गेला
बाॅलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षयकुमारच्या करिअरला सध्या ग्रहण लागले आहे. त्याचे सलग पाच चित्रपट (सेल्फी, रामसेतू, रक्षाबंधन, सम्राट पृथ्वीराज आणि बच्चन पांडे) फ्लॉप ठरले. परिणामी त्याला ‘गोरखा’सह तीन बिग बजेट चित्रपट थांबवावे लागले आहेत. २०१९ ते २०२३ दरम्यान अक्षयचे १५ चित्रपट फ्लोअरवर होते. त्यापैकी केवळ ४-५ चित्रपट प्रदर्शित झाले. पुढील तीन वर्षांत आणखी तीन चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.
अक्षय एका चित्रपटासाठी १३५ कोटी रुपये घेतो. स्वत: निर्मात्यांपैकी एक असल्यास ३० कोटी आणि नफ्यात ४० ते ४५ टक्के वाटा घेतो. तथापि, झी स्टुडिओजचे सीईओ शारिक पटेल म्हणाले, ‘‘स्टुडिओजनी बिग बजेट चित्रपटांसाठी रसद थांबवली आहे, असे सरसकट म्हणता येणार नाही, पण एक निश्चित ते म्हणजे आता स्टुडिओज बिग बजेट चित्रपटांना हात लावण्याआधी खूप विचार करीत आहे. त्यांनी कोविडपूर्व काळात पाण्यासारखा पैसा खर्च केला. आता हे प्रमाण कमी झाले आहे. तरीही शाहरुखचा ‘जवान’ किंवा ‘डंकी’पासून आमच्या झी स्टुडिओचे ‘गदर-२’ आणि हृतिक रोशनचा ‘फायटर’ हे बिग बजेट चित्रपट तयार होत आहेतच.
ट्रेड विश्लेषक अतुल मोहन म्हणाले, ‘‘जेव्हापासून कॉर्पोरेट स्टुडिओजनी भारतात पाऊल ठेवलयं त्यांनी चित्रपट निर्मिती म्हणजे आवड नसून त्याचे व्यवसायात रूपांतर केले आहे. त्यांनी जणू एक अलिखित नियमच तयार केलाय की एखाद्याने मोठ्या स्टारला साइन केले असेल तर भरमसाठ पैसा देतात. अशावेळी दिग्दर्शकाची चांदी होते. परंतु कोविडनंतर प्रेक्षकांना उत्तम, दर्जेदार कंटेट पाहण्याची सवय झाली असल्याने भलेही मोठा स्टार असो मात्र दर्जाहीन कथा, कंटेट असेल तर प्रेक्षक चित्रपटाकडे फिरकतच नाहीत.
बिग बजेट चित्रपटांपासून स्टुडिओ दूर राहणे पसंत करतात. कारण बजेटचा ७० टक्के वाटा स्टार्सच घेऊन जातात. त्यातही फ्लॉप असेल तर भीती वाटतेच. स्टार्सची हिस्सेदारी ३५-४० टक्के होत नाही तोपर्यंत हीच परिस्थिती राहील, असा अंदाज वितरण क्षेत्रातील ट्रेड विश्लेषक राज बन्सल यांनी वर्तवला.