'शो' मिळत नसल्याने 'टीडीएम'चे दिग्दर्शक व्यथित
भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. राज्यात ज्या ज्या थिएटर्समध्ये चित्रपट प्रदर्शित झाला, तिथे त्याला चांगले ओपनिंग मिळाले, पण, बऱ्याच ठिकाणी ‘टीडीएम’ चित्रपटाचे शो कॅन्सल केले जात आहेत, तसेच चित्रपटाला प्राईम टाईम मिळत नसल्याचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे व टीमचे म्हणणे आहे. नुकतेच एका थिएटरमध्ये चित्रपटाबद्दल भाऊराव कऱ्हाडे, मुख्य अभिनेता पृथ्वीराज थोरात व अभिनेत्री कालिंदी यांना अश्रू अनावर झाले. तो व्हीडीओही प्रचंड व्हायरल झाला.
यानंतर ठीकठिकाणी या चित्रपटाची चर्चा व्हायला सुरुवात झाली. सोशल मीडियावर तर बऱ्याच लोकांनी या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला. पण या सगळ्या गोष्टींमुळे भाऊराव यांनीच हा चित्रपट चित्रपटगृहातून काढून घ्यायचा निर्णय घेतला. याविषयी नुकतेच कऱ्हाडे आणि त्यातील कलाकारांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असून, त्यांच्यापुढे आता स्वतःचा जीव देण्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नाही, असे स्पष्ट केले आहे.
भाऊराव कऱ्हाडे म्हणाले, “हा सिनेमा बंद पडला, तर फाशी घेण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नाही. मी साडेतीन कोटींचं कर्ज घेऊन हा सिनेमा केला आहे. बऱ्याच बँकांचं कर्ज आहे माझ्यावर. मी सगळी माहिती देतो. माझ्या घरातून पैसे टाकून हा सिनेमा मी केलेला नाही, एक एक रुपया जोडून आम्ही यासाठी मेहनत घेतली आहे. अशी जर गळचेपी होत असेल, तर हा एकप्रकारे कलाकारांचा खून आहे. आमची फक्त एकच माफक अपेक्षा आहे की, जे आमच्या वाट्याला यायचं आहे ते येऊ द्यावं. हे सर्व बोलताना या तिन्ही कलाकारांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
इतर चित्रपटांना १५० शो, तर ‘टीडीएम’ला केवळ २० शो दिल्याचे भाऊराव यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सोशल मीडियावरही या चित्रपटाबद्दल चाहते पोस्ट टाकत आहेत. चित्रपट उत्तम आहे, पण शो मिळत नसल्याचेही सोशल मीडियावर बोलले जात आहे. कलाकारांचा थिएटरमधील व्हीडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.