... म्हणून मी लग्नानंतर नाव बदलले नाही
लीना आणि मंगेश खऱ्या आयुष्यात नवरा-बायको आहेत ही गोष्ट अनेकांना ठाऊक नव्हती. त्यांनी 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतही नवरा बायकोची भूमिका साकारली होती. तर त्यांचे 'आमने सामने' हे नाटकही प्रचंड गाजले. ते दोघेही आता 'इवलेसे रोप' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हे नाटक नात्याचे नवे अर्थ उलगडून सांगणार आहे. याच नाटकाच्या निमित्ताने लीना यांनी दिलेली एक मुलाखत सध्या चर्चेत आहे. लीना यांनी या मुलाखतीत त्यांनी लग्नानंतर नाव का बदलले नाही याबद्दल सांगितले आहे.
एका मुलाखतीत त्यांना यांच्या नावाबद्दल विचारणा करण्यात आली. लग्न झाल्यावरही तुम्ही नाव बदलले नाही आणि तेव्हा तुम्हाला काय काय ऐकून घ्यावे लागले, असे विचारताच लीना म्हणाल्या, 'मला ही वाक्य लोकांची ऐकूच येत नाहीत. मी जसे बोलले की मी जास्त लोकांमध्ये मिसळायला जात नाही. त्यामुळे कधीकधी ते बरे पडते. कारण मी हे कधी ऐकलेच नाही. मुळात मी माझे नाव काय ठेवायचे हे इतर लोक कशाला ठरवतील. ते आम्ही दोघे ठरवू ना आणि जर तुम्हालाच रस्त्यावर कुणी विचारले अचानक एक दिवस, तुझ्या डोक्यात वेगळाच विचार सुरू आहे. आणि तुला विचारले की तू लीना भागवतला ओळखतेस का? तू म्हणशील हो. पण तेच तुला विचारले तू लीना कदमला ओळखतेस का? तू म्हणशील नाही.'
पुढे लीना म्हणाल्या, 'मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर मिळवलेले ते नाव आहे. मंगेशला त्या नावाविषयी आदर आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही. बाकी लोकांचा विचार करायचा प्रश्न येतोच कुठे.' त्यावर मंगेश म्हणतात, 'मी त्या व्यक्तीच्या नावावर आणि त्या व्यक्तीच्या कामावर खूश झालो होतो. मग मी त्या व्यक्तीचे नाव कशाला बदलू?' त्यांचे 'इवलेसे रोप' हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.