संग्रहित छायाचित्र
मुंबई - भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya)गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. आयपीएल २०२४ मध्ये त्याची कामगिरी खूपच निराशाजनक ठरली. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिकची फलंदाजी, गोलंदाजी खूपच खराब राहिली. पाच वेळा चॅम्पियन ठरलेली मुंबई इंडियन्स हार्दिकच्या नेतृत्वाखाली १७ व्या हंगामात सुमार कामगिरीमुळे तळाशी राहिली. आता त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
माध्यमातील बातम्यानुसार हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकमध्ये (natasha stankovic)काहीतरी बिनसले आहे. कदाचित दोघेही वेगळे होणार, अशी चर्चा आहे. नताशा गेल्या काही दिवसांपासून लाइमलाईटपासून दूर आहे. हार्दिकच्या आयपीएल कामगिरीवरून नताशाला ऑनलाइन धमक्या आल्या होत्या. हार्दिक पंड्या आणि नताशाच्या लग्नाला ४ वर्षे झाली आहेत. दोघांचा विवाह ३१ मे २०२० रोजी झाला होता आणि त्याच वर्षी ३० जुलै रोजी त्यांचा मुलगा अगस्त्यचा जन्म झाला. हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविकने तिच्या इन्स्टाग्रामवरून पंड्या हे आडनाव काढले आहे. यामुळेच सोशल मीडियावर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचा अंदाज लावला जात आहे. यावर या जोडप्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
रेडिट वर नताशा आणि हार्दिक वेगळे झाले आहेत का अशी एक पोस्ट व्हायरल झाली आहे. कोणीतरी अशी पोस्ट शेअर केली असून या दोघांच्या वागण्यानेही त्याला खतपाणी मिळत आहे. हे दोघेही इंस्टाग्राम स्टोरीवर काहीच पोस्ट करताना दिसत नाहीत. याआधी नताशाच्या इंस्टाग्रामवर नताशा स्टॅनकोविक पंड्या असे लिहिले होते, आता तिने हे आडनाव काढून टाकले आहे.
रेडिटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “हा केवळ एक अंदाज आहे. पण दोघेही एकमेकांबद्दल इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत नाहीत. नताशाचा वाढदिवस ४ मार्च रोजी होता आणि त्या दिवशी हार्दिकने कोणतीही पोस्ट केली नाही, तिने अगस्त्यसोबत असलेल्या पोस्ट वगळता तिच्या आणि हार्दिकच्या अलीकडील काही पोस्ट डिलिट केल्या आहेत. तसेच ती यावर्षी आयपीएलच्या स्टँडमध्ये किंवा संघासंबंधीच्या कोणत्याही पोस्टमध्ये दिसली नाही. कृणाल आणि पंखुरी अजूनही तिच्या पोस्टवर कमेंट करतात. हार्दिक-नताशामध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं आहे.
गेला काही काळ हार्दिकसाठी चांगला राहिलेला नाही. वन डे वर्ल्ड कप दरम्यान हार्दिकला दुखापत झाल्याने तो बराच काळ क्रिकेटपासून लांब होता. दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिक मुंबईच्या संघाचा कर्णधार झाला. रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत हार्दिकला दिल्याने त्याला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. याचा परिणाम त्याच्या खेळावरही दिसून आला. आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही सारं काही आलबेल नसल्याची माहिती समोर येत आहे.