'द केरळ स्टोरी'ला हिरवा कंदील
'द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या प्रदर्शनात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर आता म्हणजेच शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्यावर कोणतेही बंधन राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की, 'उच्च न्यायालयाने विवेकाचा वापर करून बंदी घालण्यास नकार दिला आहे. याचिकाकर्ते उच्च न्यायालयात जाऊन त्याची प्रत मागू शकतात.
पत्रकार कुर्बान अली आणि जमियत उलेमा-ए- हिंद यांनी चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. हा चित्रपट एका विशिष्ट समुदायाबद्दल द्वेष पसरवणारा आहे, असे ते म्हणाले.
'द केरळ स्टोरी' हा चित्रपट केरळमधील ३२ हजार हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचा आहे ज्यांना 'लव्ह जिहाद'मध्ये अडकवण्यात आले होते. 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांचे धर्मांतर करून भारताबाहेर पाठवण्यात आले.
चित्रपट निर्मात्यांच्या वतीने न्यायालयात उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी सांगितले की, केरळ उच्च न्यायालयात आधीच या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. तेथे पुढील सुनावणीची तारीख पाच मे ठेवण्यात आली आहे.'
पहिल्या दिवशी सात कोटींची कमाई?
सूत्रांच्या माहितीनुसार, 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी ५ ते ७ कोटी रुपयांची कमाई करण्याची शक्यता आहे. चित्रपटात कोणताही मोठा स्टार नाही, पण देशात चित्रपटाबाबत जे वातावरण तयार होत आहे ते पाहता आगामी काळात त्याची कमाई वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, चित्रपटाला वाढत्या विरोधानंतर चित्रपटावर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठाने चित्रपटावर कोणतीही कारवाई करण्यास नकार दिला.‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून वातावरण तापण्याची शक्यता; प्रदर्शनापूर्वीच ‘या’ राज्यात हाय अलर्ट जारी!
तमिळनाडूत 'हाय अलर्ट'
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये केरळमधून जवळपास ३२ हजार महिला बेपत्ता झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. आता निर्मात्यांनी त्यात बदल केला आहे. आज या चित्रपटाच्या नवीन टीझरच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक मोठा बदल केला गेला. आता त्या जागी असे लिहिण्यात आले आहे की, तीन महिलांचा ब्रेनवॉश करून, त्यांचे धर्मांतर करून त्यांना भारत आणि परदेशातील दहशतवादी मोहिमांवर पाठवण्यात आले होते. या चित्रपटावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी तमिळनाडूमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच हाय अर्लट जारी करण्यात आला आहे.
तमिळनाडूतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “ चित्रपटाविरोधात काही गटांनी निषेधाचे आवाहन केले आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्टही जाहीर करण्यात आली आहे. या पोस्टची गुप्तचर विभागाने गंभीर दखल घेतली आहे. “ काही जिल्ह्यांमध्ये इस्लामिक गटांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मात्र, सरकारने अद्याप ही मागणी मान्य केलेली नाही, तर सगळ्या सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.