संग्रहित छायाचित्र
अभिनेता किरण गायकवाड कायमच आपल्या भूमिकेमुळे चर्चेत राहिलेला आहे. किरणने 'लागिरं झालं जी' या मालिकेत 'भैय्यासाहेब' हे पात्र लोकप्रिय केले. यानंतर 'देवमाणूस' या मालिकेतील डॉक्टरची प्रमुख भूमिका अतिशय गाजली. यानंतर सिनेमात पदार्पण केलेल्या किरणचा 'चौक' हा सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला पडली. या सिनेमा दरम्यानच किरण गायकवाड एका कठीण प्रसंगातून जात असल्याचा त्याने खुलासा केला.
सहा महिन्यांपूर्वी किरणचे लग्न ठरले होते ते मोडले. या सहा महिन्यांच्या काळात संभाव्य पत्नीशी ३ ते ४ वेळा भेट झाली होती. या काळात मी भावी पत्नीसोबत भविष्याची काही स्वप्न रंगवली होती. सगळे सुरळीत सुरू असताना मला फसवण्यात आले. यामुळे ठरलेले लग्न मोडले. हा काळ अतिशय कठीण होता. या काळात मला डिप्रेशनच्या गोळ्या घ्याव्या लागल्याचे किरण म्हणाला. हा काळ माझ्यासाठी अतिशय कठीण होता. एका बाजूला सिनेमाचे शूटिंग सुरू होते तर दुसरीकडे अशा कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत होते. या सगळ्या प्रसंगाचा माझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम झाला. कळत होते की, आपण चुकीचा विचार करतोय. पण तरी देखील ती परिस्थिती अशी असते की, या काळात आपल्याला तिसऱ्या व्यक्तीची गरज लागते. जे झाले ते चुकीचे झाले, हे सांगायला एक हात पाठीवर हवा असतो.
त्यामुळे डिप्रेशनच्या काळात डॉक्टरांची खूप मदत झाल्याचे त्याने सांगितले. फसवणूक ही भावनाच त्रासदायक आहे, पण भविष्यात मोठा चुकीचा प्रकार घडण्यापेक्षा ही गोष्ट सुरुवातीलाच झाली हे समजून घेणे असा विचार करावा. जवळच्या व्यक्तीशी बोला, मन मोकळे करा. भावना व्यक्त करणे गरजेचे आहे. ही परिस्थिती फक्त आपल्यावरच घडली आहे हा विचार मनातून काढून टाका.