सलमानच्या सुरक्षेवर फडणवीसांचा पलटवार
बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कुख्यात डॉन लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमानला सतत जिवे मारण्याच्या धमक्या येत आहे. या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सलमानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलमान खानच्या सुरक्षेबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
रजत शर्मांच्या मुलाखतीत सलमानने सतत जिवे मारण्याच्या धमकीवर खुलेपणाने भाष्य केले. 'मला कितीही धमक्या आल्या तरीही यूएईमध्ये सुरक्षित वाटते. पण भारतामध्ये थोडी समस्या आहे', असे सलमान म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. फडणवीस म्हणाले, 'सलमान खानला देण्यात आलेली सुरक्षा सर्वोच्च दर्जाची आहे. त्याला मुंबईत किंवा भारतात कुठेही फिरायला हरकत नाही. मला वाटते मुंबईपेक्षा कुठलीही जागा सुरक्षित नाही.' फडणवीसांचे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.
सतत येणाऱ्या धमकीनंतर कसे जगतोय याबाबतही सलमानने बिनधास्तपणे संवाद साधला. सलमान म्हणाला, “मी प्रत्येक ठिकाणी पूर्ण सुरक्षेत जात आहे. मला माहिती आहे की, कितीही प्रयत्न केला तरी जे व्हायचे ते होणार आहे. मला वाटते देव आहे. याचा अर्थ मी उघडपणे फिरायचे असा नाही. आता माझ्याभोवती खूप सारे 'शेरा' आहेत. माझ्याभोवती इतक्या बंदुका आहेत की, कधी कधी मलाच भीतीच वाटते. जे काही मला सांगितले जात आहे, त्या सर्व गोष्टी मी करीत आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटात एक डायलॉग आहे, त्यानुसार तुम्हाला १०० वेळा भाग्यवान असावे लागते. पण मला फक्त एकदाच भाग्यवान ठरायचे आहे. त्यामुळे मला फार काळजी घ्यावी लागणार आहे,” असेही सलमान म्हणाला.