शिक्षणापेक्षा सानियाच्या स्कर्टच्या लांबीची चिंता

अभिनेते नसिरुद्दीन शाह त्यांच्या परखड भाष्यासाठी परिचित आहेत. मग तो विषय चित्रपट समीक्षेचा असो, एखाद्या भूमिकेचा असो किंवा मग सामाजिक मुद्द्यांचा असो. अनेक राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरदेखील नसिरुद्दीन शाह यांनी स्पष्ट भूमिका मांडल्या आहेत. सध्या नसिरुद्दीन शाह यांनी मांडलेल्या अशाच एका भूमिकेची जोरदार चर्चा चालू आहे. सुप्रसिद्ध मुलाखतकार करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीत नसिरुद्दीन शाह यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Thu, 13 Jun 2024
  • 02:59 pm

संग्रहित छायाचित्र

अभिनेते नसिरुद्दीन शाह त्यांच्या परखड भाष्यासाठी परिचित आहेत. मग तो विषय चित्रपट समीक्षेचा असो, एखाद्या भूमिकेचा असो किंवा मग सामाजिक मुद्द्यांचा असो. अनेक राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरदेखील नसिरुद्दीन शाह यांनी स्पष्ट भूमिका मांडल्या आहेत. सध्या नसिरुद्दीन शाह यांनी मांडलेल्या अशाच एका भूमिकेची जोरदार चर्चा चालू आहे. सुप्रसिद्ध मुलाखतकार करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीत नसिरुद्दीन शाह यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे, एनडीए सरकारची धोरणे,  देशातील धार्मिक द्वेषाचे राजकारण, सामाजिक समस्या अशा अनेक मुद्द्यांवर नसिरुद्दीन शाह यांनी यावेळी भूमिका मांडली. देशात धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नसिरुद्दीन शाह यांना विचारणा केली असता त्यावर त्यांनी यात देशातील मुस्लिमांचीही चूक असल्याचे मत मांडले आहे. मोदींना विरोध करणे फार सोपे आहे. देशात जे काही चुकीचे चालले आहे,  त्यासाठी मोदींना दोष देणे फार सोपे आहे. पण मोदी सत्तेत येण्याआधीही या देशात खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी होत्या हे वास्तव आहे. भारतात भिन्न धर्मीयांमध्ये छुप्या स्वरुपात नकारात्मक भावना होत्याच. मला लहानपणी मुस्लीम असल्याबाबत हेटाळणीचा सामना करावा लागला होता. मीही इतरांना त्यांच्या धर्मावरून चिडवायचो. मला वाटते या प्रकारच्या भावना या देशात कायम छुप्या स्वरुपात होत्या. मोदींनी या सगळ्या गोष्टींचा फायदा घेण्यात हुशारी दाखवली, असे नसिरुद्दीन शाह म्हणाले.

धर्मनिरपेक्षता किंवा समानतेचे जे काही उरले-सुरले अवशेष शिल्लक होते, ते उद्ध्वस्त करण्याची संधीच यामुळे उपलब्ध झाली. याआधी आपण सुखी आणि समृद्ध होतो, सगळे काही चांगले होते, असे जे काही दावे केले जातात ते चुकीचे आहेत. तशी परिस्थिती नव्हती. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे चित्र चित्रपटांमधून किंवा गाण्यांमधून उभे केले जायचे. ते तसे व्हावे यासाठीचा तो एक प्रयत्न होता. पण मला वाटत नाही की देशाने त्याचा स्वीकार केला आहे. फक्त काहींनी स्वीकार केला. त्यामुळे ही गाणी म्हणजे फक्त शब्दच्छल होता, असेही नसिरुद्दीन शाह यांनी नमूद केले.
दरम्यान, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतानाच नसिरुद्दीन शाह यांनी मुस्लिम समुदायाचीही चूक असल्याचे स्पष्ट केले. माझ्या सहा पिढ्या या देशात संपल्या, या देशाने मला प्रेम करायला शिकवले. पण काही प्रसंगी मला हा देश काही वेगळाच वाटला, असे ते म्हणाले. सत्य हे आहे की मुस्लिमांनीही कधी या गोष्टींची तक्रार केली नाही. मुस्लिमांनी आत्तापर्यंत सर्व चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले. शिक्षणाविषयी चिंता करण्यापेक्षा त्यांना हिजाब, सानिया मिर्झाच्या स्कर्टच्या लांबीची चिंता आहे. त्यांनी शिक्षणाविषयी काळजी करायला हवी. त्यांनी मुलांना आधुनिक गोष्टींचे प्रशिक्षण द्यायला हवे. मदरशांमध्ये मुलांना ठेवून त्यांना कायम धार्मिक गोष्टींचे शिक्षण देण्यापेक्षा त्यांनी मुलांना आधुनिक शिक्षण द्यायला हवे. ही मुस्लिमांची चूक आहे,  असे भाष्य नसिरुद्दीन शाह यांनी यावेळी केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story